![]()
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असतानाच आता ठाकरे गटासाठी आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटातील तब्बल 13 ते 14 आमदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील, असा मोठा दावा केला आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या यशानंतर आता ‘ऑपरेशन टायगर 2.0’ची चर्चा सुरू झाली असून, बांगर यांच्या विधानामुळे ठाकरे गटातील अस्वस्थता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘सहा महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं’ हिंगोलीत माध्यमांशी बोलताना संतोष बांगर म्हणाले, “सहा महिन्यांपूर्वीच मी सांगितलं होतं की काही खासदार शिवसेनेत येतील. आज ते वास्तवात घडलं आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सहाही खासदार आमच्यासोबत आले आहेत.” हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या निर्णयाचे स्वागत करताना त्यांनी हा पक्षाच्या विस्ताराचा टप्पा असल्याचे म्हटले. ’13 ते 14 आमदारही येणार’ यावेळी पत्रकारांनी ठाकरे गटातील आणखी आमदार शिंदे गटात येणार का, असा प्रश्न विचारला असता संतोष बांगर यांनी थेट संकेत दिले. “आगे आगे देखो होता है क्या… तुम्ही जे बोलत आहात तेही झाल्याशिवाय राहणार नाही.” यानंतर त्यांनी दावा केला की, “उबाठा गटातील 13 ते 14 आमदार आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील.” त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. ‘बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना आमचीच’ संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा विचारधारेचा मुद्दा पुढे करत म्हटले, “बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. शिंदे साहेब हिंदुत्वाच्या विचारांवर महाराष्ट्राला पुढे नेत आहेत.” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि जनतेतील प्रतिसादातही शिंदे गटाला पाठिंबा वाढत असल्याचा दावाही त्यांनी केला. हिंगोलीत नागेश आष्टीकरांच्या स्वागताचे बॅनर दरम्यान, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरात संतोष बांगर यांच्या वतीने मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर, “हिंगोली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतल्याबद्दल खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे अभिनंदन” असा मजकूर झळकत आहे. यामुळे बंडखोर खासदारांच्या निर्णयाला शिंदे गटाकडून उघड समर्थन मिळत असल्याचे दिसून येत आहे. ‘ऑपरेशन टायगर’मध्ये कोणते खासदार सहभागी? राजकीय वर्तुळात सध्या खालील सहा खासदारांनी ठाकरे गटाची साथ सोडल्याची चर्चा आहे: या सर्व खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाबाबत पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरेंसोबत उभे राहिलेले तीन खासदार या मोठ्या राजकीय घडामोडींमध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत तीन खासदार ठामपणे उभे असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये अरविंद सावंत] अनिल देसाई, राजाभाऊ वाजे यांचा समावेश आहे. दिल्लीत झालेल्या संसदीय बैठकीलाही हे तिन्ही खासदार उपस्थित होते. खासदारांनंतर आमदारांची फूट पडणार? 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करत शिवसेनेत मोठी फूट पाडली होती. त्यानंतर आता लोकसभेतील सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अशातच संतोष बांगर यांनी केलेला “13 ते 14 आमदारही आमच्यासोबत येतील” हा दावा खरा ठरतो का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कारण जर हा दावा वास्तवात उतरला, तर ‘ऑपरेशन टायगर’चा पुढचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठा भूकंप घडवू शकतो.
Source link
'आगे आगे देखो होता है क्या!':6 खासदारांनंतर आता 14 आमदारही फुटणार? शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा खळबळजनक दावा