![]()
अनेक शेतातील विहिरींनी गाठला तळ मिरची लागवड करून बरेच दिवस झाले आहेत. आता विहिरींचे पाणी संपत आले आहे. पाऊस सुरू झाला, तरच लाखो रुपये खर्च करून जोपासलेली मिरची वाचेल. अन्यथा आम्हा शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल, असे शेतकरी दिनेश गोडसे यांनी सांगितले. वाढत्या उन्हाचा मिरची पिकावर परिणाम होत आहे. प्रतिनिधी | बनकिन्होळा एकीकडे आग ओकणारा सूर्य आणि दुसरीकडे पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी सुरू असलेली धडपड, अशा दुहेरी संकटात सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळासह बाभूळगाव बु., चिंचखेडा, निल्लोड, भायगाव, गेवराई सेमी, वरखेडी आणि कायगाव परिसरातील मिरची उत्पादक शेतकरी सापडले आहेत. नगदी पीक म्हणून लाखो रुपयांचा खर्च करून शेतकऱ्यांनी मिरचीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. मात्र, आता या पिकावर कडक उन्हाचे सावट गडद झाले असून, शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. परिसरात यंदा मिरचीची वाढ सुरुवातीला समाधानकारक झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे. तीव्र उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात फुलगळ होत असून झाडे करपू लागली आहेत. विहिरींमधील पाणीपातळी झपाट्याने खाली गेल्याने पिकाला पाणी देणे कठीण झाले आहे. पीक वाचवण्यासाठी शेतकरी रात्री उशिरापर्यंत किंवा पहाटे ठिबक सिंचनाद्वारे पाणी देत आहेत. उष्णतेमुळे थ्रिप्स फुलकिडेआणि चुरडा-मुरडा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने औषध फवारणीचा खर्च दुपटीने वाढला आहे. उष्णतेमुळे मिरची लवकर खराब होत असल्याने शेतकऱ्यांना माल तातडीने बाजारात विकावा लागत आहे. सध्या बाजारात मिरचीला प्रतिक्विंटल ४,२०० रुपयांचा भाव मिळत असला, तरी घटणारे उत्पादन यामुळे नफा मिळण्याची शक्यता धूसर आहे. दरम्यान, पिकांसाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जाण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे टाकले आहे. शासनाने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी बनकिन्होळा येथील शेतकऱ्यांतून होत आहे.
Source link
शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत:बनकिन्होळा परिसरात मिरची पीक होरपळले, पिके जगवण्यास केलेला लाखोंचा खर्च पावसाअभावी संकटामध्ये