![]()
शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाच्या तपासात २०१४ ते २०२५ या ११ वर्षांच्या कालावधीत बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटीने नाशिकमध्ये बुधवारी तब्बल ११ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यात शिक्षण विभागातील बडे अधिकारी आणि भ्रष्ट संस्थाचालकांवर कारवाईची टांगती तलवार कायम असल्याने सर्वांचे धाबे दणाणले. राज्यात या प्रकरणात १६ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, राहुल पवार आणि किरण पाटील या संशयितांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मात्र या घोटाळ्याचे हे केवळ टोक असून घोटाळ्याची पाळेमुळे खूप खोलवर रुजलेली असल्याने अजूनही तपास सुरू आहे. ११९९ संशयित दोषी असल्याचा आरोपपत्रात उल्लेख या घोटाळ्यात शिक्षण विभाग आणि संस्थाचालकांसह शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शालेय शिक्षण विभागाशी संबंधित ११९९ संशयित दोषी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्वांचा या दोषारोपपत्रात समावेश आहे. या प्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आता तपास यंत्रणेने आपला मोर्चा इतर संशयितांकडे वळवला आहे. या सर्वांनाही चौकशीकरिता लवकरच पाचारण केले जाणार आहे.
Source link
160 कोटींचा शालार्थ आयडी घोटाळा:11 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल