Headlines

आषाढी वारीसाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे चोख नियोजन:वाहतूक मार्गांत मोठे बदल, एसपी संदीप सिंह गिल यांची माहिती




पुणे ग्रामीण पोलिसांनी आषाढी वारी २०२६ साठी चोख नियोजन केले आहे. वारकऱ्यांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि वाहतूक कोंडी टाळणे हा या नियोजनाचा मुख्य उद्देश आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी एका पत्रकार परिषदेत वारीच्या तयारीची सविस्तर माहिती दिली. यंदा ८ जुलै २०२६ रोजी आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होईल, तर देहू येथून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निघेल. ९ जुलै रोजी या दोन्ही पालख्या पुण्यात दाखल होणार आहेत. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वारी मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये २ अतिरिक्त पोलीस अधीक्षक, १० पोलीस उपअधीक्षक, ३५ पोलीस निरीक्षक, १३६ सहाय्यक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक आणि १,६२४ पोलीस अंमलदार यांचा समावेश असेल. राज्य राखीव पोलीस दलाच्या कंपन्याही मदतीसाठी उपस्थित राहतील. वारी मार्गावरील महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चोवीस तास लक्ष ठेवले जाईल. सुरक्षेचा उपाय म्हणून, पालखी मार्गक्रमण काळात मार्गावरील सर्व दारू आणि मटणाची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि ती सुरळीत ठेवण्यासाठी ११ ते १८ जुलै या कालावधीत वाहतूक मार्गांत बदल करण्यात आले आहेत. पुणे ते सासवड मार्गावर ११ ते १३ जुलै दरम्यान दिवे घाट आणि बोपदेव घाट सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहतील. पुणे बाजूने सासवडला जाणारी वाहने खडी मशीन चौक-कात्रज-कापूरहोळ मार्गे जातील, तर सासवडकडून पुण्यात येणारी वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे वळवली जाईल. १३ ते १४ जुलै रोजी सासवड ते जेजुरी-वाल्हे दरम्यान पुणे ते नीरा वाहतूक झेंडेवाडी-पारगाव मेमाणे-सुपे-मोरगाव-नीरा या पर्यायी मार्गाने वळवण्यात येईल. पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ८ जुलैपर्यंत अवजड वाहनांना बंदी असेल. ही वाहने केडगाव चौफुला-न्हावरे-शिरूर मार्गे वळवण्यात आली आहेत. याशिवाय, ‘हरित वारी’ उपक्रमांतर्गत संपूर्ण पालखी मार्गावर सुमारे १० हजार वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प ग्रामीण पोलिसांनी केला आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी वारी काळात भाविक आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *