![]()
कायद्यानुसार एखाद्या गुन्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा सहभाग असेल तर ती केवळ चोरी ठरत नाही, तर तो दरोडा असतो, असे सांगत राम मंदिर प्रकरणात पाचपेक्षा जास्त लोक सामील असल्याने हा थेट प्रभू श्रीरामाच्या मंदिरावर पडलेला दरोडा आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. केवळ दानपेटीतील पैशांवरच नव्हे, तर प्रभू श्रीरामाच्या मुख्य आभूषणांवर आणि मूर्तींच्या दागिन्यांवरही डल्ला मारण्यात आला आहे. संजय राऊत म्हणाले की, हा केवळ पैशांचा अपहार नाही. प्रभू श्रीरामांचा मुख्य सोन्याचा मुकुट, त्यांचे सिंहासन, गळ्यातील मौल्यवान कंठा, माता सीतेची कर्णफुले आणि गळ्यातील हार देखील चोरीला गेले आहेत. इतकेच नव्हे तर प्रभू श्रीरामांच्या पवित्र पादुकाही जागेवरून गायब झाल्या आहेत. एवढे सगळे मौल्यवान ऐवज चोरीला गेलेले असतानाही सत्ताधारी आणि संबंधित यंत्रणा मात्र लोकांना संयम व धैर्य राखण्याचा सल्ला देत आहेत, यावर राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आता संयमाचा बांध सुटला असून शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. एकपक्षीय ट्रस्ट बरखास्त करा संजय राऊत म्हणाले की, काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या लुटीविरोधात एल्गार पुकारून आंदोलनाची घोषणा केली. त्यानंतरच संघाने या विषयावर आपली भूमिका मांडली आहे, त्याआधी संघ गप्प का होता, असा सवाल त्यांनी केला. या आंदोलनाची ठिणगी पडली तर देशात वणवा पेटेल, याची जाणीव झाल्यामुळेच संघ आता भाजपची कातडी वाचवण्यासाठी स्वतःची ढाल पुढे करत आहे. हा राम मंदिर ट्रस्ट केवळ भाजपचा एकपक्षीय ट्रस्ट बनला असून तो तातडीने बरखास्त करण्यात यावा आणि चोरांना पाठीशी घालण्याऐवजी ट्रस्टवर थेट कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. आता संयमाची भाषा करताय? कारसेवा आंदोलनाचा संदर्भ देत राऊत यांनी भाजप आणि संघाला धारेवर धरले. जर कारसेवकांनी पूर्वी संयम पाळला असता, तर राम मंदिर कधीच उभे राहिले नसते. तेव्हा संयमाचा बांध सुटला म्हणूनच बाबरीचा ढाचा पाडला गेला. त्या आंदोलनात 1,000 कारसेवकांनी आणि त्यानंतर झालेल्या दंगलीत 650 शिवसैनिकांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले. त्या कठीण काळात संघ किंवा भाजप कुठेही मैदानात नव्हते. आज सर्व काही आयते तयार झाल्यावर तुम्ही आम्हाला संयम शिकवत आहात, असा टोला त्यांनी लगावला. हा लढा राजकीय नसून उद्या मुंबईत होणारे आंदोलन लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. हे ही वृत्त वाचा ‘ना सेंट्रली डायरेक्ट, ना रिमोट कंट्रोल’:राम मंदिर वादाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांचे वक्तव्य
समाजात अनेक संघटना असून उपक्रम सुरू आहेत. या सर्व संघटनांचे संचालन संघच करतो, संघ त्यांना “सेंट्रली डायरेक्ट’ किंवा “रिमोटली कंट्रोल’ करतो, असा लोकांचा मोठा गैरसमज आहे. पण संघ कार्याच्या रचनेत असे अजिबात होत नाही, असे ठाम प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. वाचा सविस्तर
Source link
राम मंदिरावर दरोडा पडलाय:प्रभू रामाचा मुकुट, दागिने अन् पवित्र पादुकाही चोरीला, ठाकरेंनी एल्गार पुकारल्यावरच संघ जागा झाला- राऊत