Headlines

ई-20 इंधनामुळे कार्यक्षमतेत नगण्य घट:वाहनांची कठोर चाचणी, सुरक्षिततेची हमी; इथेनॉल मिश्रित पेट्रोलबाबत एआरएआयचे स्पष्टीकरण




पुण्यातील ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (एआरएआय) च्या कोथरूड येथील मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ‘ई-२०’ (२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) इंधनाच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देण्यात आले. एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, बाजारात आणण्यापूर्वी प्रत्येक वाहनाची अत्यंत कठोर चाचणी घेतली जाते. ग्राहकांना सुरक्षित आणि विश्वासार्ह वाहने मिळावीत यासाठी, वाहन उत्पादक कंपन्यांद्वारे वेगवेगळ्या श्रेणीतील वाहनांची प्रयोगशाळा आणि प्रत्यक्ष रस्त्यांवर सुमारे ४० हजार ते ६० हजार किलोमीटरपर्यंत कठोर चाचणी केली जाते. या सर्व चाचण्या आंतरराष्ट्रीय मानकांचा दर्जा राखून व निकषांचे पालन करून घेतल्या जातात, ज्यामुळे इंजिन आणि इंधन वाहून नेणाऱ्या वाहिन्यांच्या दीर्घकालीन आरोग्याची खात्री मिळते. या पत्रकार परिषदेत ई-२० इंधनामुळे मिळणाऱ्या मायलेज किंवा इंधन कार्यक्षमतेबाबत पसरलेल्या शंकांचेही निरसन करण्यात आले. एआरएआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, मानक प्रयोगशाळेतील चाचण्यांनुसार या इंधनामुळे इंधन कार्यक्षमतेत होणारी घट अत्यंत नगण्य असून ती केवळ २ ते ६ टक्के इतकीच मर्यादित आहे. वाहनांच्या प्रत्यक्ष इंधन वापरात किंवा मायलेजमध्ये होणारा फरक हा प्रामुख्याने चालकाची वाहन चालवण्याची पद्धत, रस्त्यांची स्थिती आणि वाहनाची देखभाल यांसारख्या बाह्य घटकांवर अवलंबून असतो. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या वाहनांची नियमित देखभाल व सर्व्हिसिंग अधिकृत डीलरकडूनच करून घ्यावी, जेणेकरून कोणत्याही समस्येचे वेळेत निराकरण होईल आणि वाहनाची कार्यक्षमता टिकून राहील. शेवटी, पॅनेलने नमूद केले की, बीएस-६ मानकांसह ई-२० इंधनाचा वाढता वापर हे भारतासाठी शाश्वत आणि आत्मनिर्भर पुरवठा साखळी निर्माण करण्याच्या दृष्टीने टाकलेले एक मोठे ऐतिहासिक पाऊल आहे. एआरएआय आणि भारतीय वाहन उद्योग देशाच्या इथेनॉल-मिश्रण आराखड्याला पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध आहेत. ई-२०-सज्ज वाहने ही प्रगत अभियांत्रिकी प्रक्रियेतून विकसित करण्यात आली असून, यामुळे ग्राहकांना एक सुरक्षित, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक वाहन चालवण्याचा उत्कृष्ट अनुभव मिळेल, असा विश्वास यावेळी एआरएआयच्या वतीने व्यक्त करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *