![]()
अकरावीचे प्रवेश जवळपास पूर्ण झाले असून, येत्या १५ जुलैपासून नियमित वर्ग सुरू होणार आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेंद्र पालकर यांनी याबाबतची सूचना जारी केली आहे.
.
शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये आतापर्यंत २८ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होतील.
अकरावी प्रवेशाची चौथी फेरी ३ जुलैपासून सुरू होऊन ६ जुलैपर्यंत चालणार होती. मात्र, पूरस्थिती, अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक अडथळ्यांमुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. त्यामुळे शासनाने प्रवेश निश्चित करण्याची मुदत ८ जुलैपर्यंत वाढवली होती.
चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयांचे वाटप (कॉलेज अलॉटमेंट) ३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अधिकृत पोर्टलवर जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार, ३ जुलैच्या दुपारी ४ वाजल्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. आता यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसून, १५ जुलैपासून अकरावीचे नियमित वर्ग सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, अमरावती महानगरपालिका क्षेत्रात आणि जिल्ह्यात अकरावीच्या अनेक जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही वर्षांचा कल पाहता, नामांकित महाविद्यालयांचे कट-ऑफ ८५ टक्क्यांहून अधिक असले तरी, कला आणि वाणिज्य शाखांच्या तुलनेत विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त दिसून येत आहे.
जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १८ हजार ५७० जागा आहेत, तर कला शाखेच्या १८ हजार ३०० आणि वाणिज्य शाखेच्या ६ हजार २४० जागा आहेत. एकूण ४३ हजार ११० जागांपैकी चौथ्या फेरीतील प्रवेश वगळता अजूनही ३१ हजार ३६७ जागा रिक्त आहेत.