Headlines

ॲग्रीस्टॅक, ई-केवायसी शिवाय कर्जमाफी नाही:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेसाठी प्रशासनाचे आवाहन




राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शकपणे मिळावा, यासाठी निश्चित कार्यपद्धती आखण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक आणि ई-केवायसीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत. तसेच बँकेतील कर्ज खात्याची माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्यावी. लाभ वितरणाची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी संबंधित बँकेकडे असलेली शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत असणे महत्त्वाचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या कर्ज खात्याचा तपशील बँकेत तपासावा. कर्जाचा प्रकार, कर्जाची रक्कम, खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती बँकेच्या नोंदीत अचूक असल्याची खात्री करून घ्यावी, असे कृषी विभागाने म्हटले आहे. योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक, बँक पासबुक किंवा कर्ज खात्याचा तपशील, पीककर्ज मंजुरीची माहिती, सातबारा उतारा (७/१२), आवश्यकतेनुसार आठ-अ उतारा (८अ), ॲग्रीस्टॅक नोंदणीची माहिती, ई-केवायसी पूर्ण झाल्याची नोंद आणि बँकेने मागितलेली इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. या योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाईल. संबंधित बँका आणि शासनाच्या यंत्रणांकडून पात्र कर्ज खात्यांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर माहितीची छाननी करून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येईल आणि शासनाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. शेतकऱ्यांनी आपल्या बँकेशी नियमित संपर्क ठेवावा आणि बँकेकडून आवश्यक असल्यास अतिरिक्त माहिती किंवा कागदपत्रे तातडीने सादर करावीत. यामुळे लाभ वितरणाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ होण्यास मदत होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून, शेतकऱ्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीसाठीचा एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. या योजनेत आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी. तसेच आपल्या आधारशी मोबाईल क्रमांक जोडलेला असल्याची खात्री करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास पात्र शेतकऱ्यांनाही या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *