![]()
“भारतीय जनता पार्टीची वाटचाल देशातील लोकशाही मोडीत काढण्याच्या दिशेने सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे भारतातही ‘राष्ट्राध्यक्ष पद्धत’ लागू करण्याच्या हालचाली केंद्रात सुरू आहेत,” असा अत्यंत गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकार, २०२९ च्या निवडणुका आणि महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत अनेक मोठे राजकीय दावे केले आहेत. देशात ‘वन पार्टी, वन इलेक्शन’ आणण्याचा डाव केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना संजय राऊत म्हणाले की, “भाजपला ‘वन नेशन, वन इलेक्शन’पेक्षा ‘वन पार्टी, वन इलेक्शन’ मध्ये जास्त रस आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली ‘डिलिमिटेशन बिल’ मंजूर करून संपूर्ण देशच ताब्यात घेण्याचे राजकारण दिल्लीत शिजत आहे. यातूनच देशात राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा त्यांचा विचार आहे.” “२०२९ मध्ये मोदी सरकार जाणार; फडणवीसांना शुभेच्छा!” भविष्यातील राजकीय गणितांवर बोलताना राऊत यांनी मोठी भविष्यवाणी वर्तवली. ते म्हणाले, “२०२९ नंतर भाजपची सत्ता येणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच राज्याच्या राजकारणातून केंद्रात जातील असे म्हटले जात आहे. जर ते केंद्रात जाऊन देशाचे पंतप्रधान झाले, तर आमच्या त्यांना नक्कीच शुभेच्छा असतील.” फडणवीस केंद्रात गेल्यास महाराष्ट्रात भाजपची सर्व सूत्रे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हाती येतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. “शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत” राज्याच्या नेतृत्वाबाबत बोलताना राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. “माझा अंदाज असा आहे की, एकनाथ शिंदे हे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत. तसेच, गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड खराब असल्याने त्यांच्याकडेही नेतृत्व जाण्याची शक्यता नाही,” असा स्पष्ट दावा राऊत यांनी केला. १८ जुलैला नागपुरात ‘रामरक्षा’ आंदोलनाचा दुसरा टप्पा आगामी आंदोलनाची माहिती देताना राऊत यांनी भाजपला थेट त्यांच्या बालेकिल्ल्यात आव्हान दिले आहे. ते म्हणाले, “आम्ही जे आंदोलन सुरू केले आहे, त्याचा पहिला टप्पा मुंबईत यशस्वीपणे पार पडला. आता या आंदोलनाचा दुसरा टप्पा येत्या १८ जुलै रोजी थेट नागपुरात पार पडणार आहे.” या रामरक्षा आंदोलनामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह राज्यातील रामप्रेमी जनता मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा.. संघर्षाचा पहिला मोठा विजय:कर्जमाफीच्या दोन जाचक अटी हटल्या, शेतकऱ्यांचा लढा अद्याप सुरूच राहणार- रविकांत तुपकर कर्जमाफीच्या निकषांमधील दोन महत्त्वाच्या जाचक अटी हटवण्याचा निर्णय हा शेतकरी आंदोलनाचा पहिला मोठा विजय असल्याचा दावा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असून, बैठक संपताच विधानसभेत त्याची अधिकृत घोषणा करण्यात आल्याचे तुपकर यांनी सांगितले. सविस्तर वाचा
Source link
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत:राज्यात भाजपची सूत्रे बावनकुळेंकडे जातील, संजय राऊतांची राजकीय भविष्यवाणी