![]()
संपूर्ण राज्यात सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यानंतर आता मान्सूनने विश्रांती घेतली आहे. सध्या महाराष्ट्रात कोरडे वातावरण निर्माण झाले असून तापमानातही वाढ होऊ लागली आहे. जुलै महिना अर्धा संपत आला तरी अनेक जिल्ह्यांत अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी दुबार
.
पावसाने विश्रांती का घेतली?
सध्या मान्सूनची लाट कमकुवत झाली असून, पश्चिमेकडून कोरडे वारे वाहत असल्यामुळे आर्द्रतायुक्त वाऱ्यांना चालना मिळत नाहीये. यामुळे मुसळधार पावसाचे ढग गायब झाले आहेत. हवामान विभागानुसार, गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रावर येऊन विरून गेला, त्यामुळे पावसाचा जोर कमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी घाटमाथ्यावर 500 ते 600 मिलिमीटर कोसळणारा पाऊस आता थेट शून्यावर आला आहे. भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले की, हवामान प्रणाली कमकुवत झाल्याने किमान पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता नाही.
आजची प्रदेशनिहाय स्थिती…
मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. हिंगोली व नांदेड जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस होईल. मात्र परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहील.
कोकण: रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर ओसरला असून, आज संपूर्ण किनारपट्टीवर केवळ हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र: सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून साताऱ्याच्या घाटमाथ्यात जोर वाढू शकतो. मात्र, सोलापूर जिल्ह्यात आज वातावरण पूर्णपणे कोरडे राहील.
उत्तर महाराष्ट्र व खान्देश: नाशिकमध्ये हलका पाऊस, तर अहिल्यानगरमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह हलका पाऊस होऊ शकतो.
विदर्भ: नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळसह संपूर्ण विदर्भात आज हवामान शांत राहील.
पावसाची मोठी तूट; शेतकरी चिंतेत
यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव जाणवत असून सरासरीच्या 10 टक्के कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील लातूर, बीड, परभणी तसेच सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशभरातील 372 जिल्ह्यांमध्ये मान्सून कमकुवत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल एक कोटी हेक्टर कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
पाऊस पुन्हा कधी कोसळणार?
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा नवीन हवामान प्रणाली सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल…
16 जुलै: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
17 जुलै: अरबी समुद्रातील पश्चिमेकडील वारे बळकट झाल्याने महाराष्ट्रात कोकण आणि घाटमाथ्याच्या परिसरात पाऊस पुन्हा सक्रिय होईल.
20 जुलै: 20 जुलैपासून मुंबई आणि पुण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये व्यापक आणि मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पेरणीच्या कामांना गती मिळू शकेल.