![]()
शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी गट एनडीएमध्ये सामील होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तरच शरद पवार गटाला एनडीएमध्ये सोबत घेऊ, अशी अट भाजप हायकमांडने टाकली आहे. विलीनीकरण झाले तर सुप्रिया सुळे आणि पार्थ प
.
शरद पवारांनी यापूर्वी किमान तीनदा भाजपसोबत जाण्याची तयारी दाखवून ऐनवेळी माघार घेतली होती. तो अनुभव लक्षात घेऊनच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा आग्रह धरला जात आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, सुप्रिया सुळेंनी सांगितले की, भाजपशी कोणतीही बोलणी सुरू नाहीत. जयंत पाटील म्हणाले की, आम्ही एनडीएसोबत जाणार नाही. मी राज्यात अर्थमंत्री होणार या दाव्यातही तथ्य नाही.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा विरोध, तरीही २२ जुलैकडे लागले सर्वांचे लक्ष
लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक, महिला आरक्षण संसदेत मंजूर करून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांना शरद पवार गटाच्या खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. २२ जुलै हा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जन्मदिन आहे. त्या दिवशी विलीनीकरणाचे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही गट एकत्र आले तर एकीकृत राष्ट्रवादीला केंद्रात दोन आणि राज्यात एक मंत्रिपदाचा प्रस्ताव आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या विलीनीकरणास अनुकूल नसल्याने त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. पार्थ यांना मंत्रिपद मिळाल्यास आपली संधी हुकणार असे लक्षात आल्याने प्रफुल्ल पटेल नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोण काय म्हणाले?
प्रफुल्ल पटेल : विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव असल्यास तो २९ तारखेनंतर आधी आमच्या पक्षाच्या सुकाणू समितीसमोर येईल. त्यानंतर तो आमदार आणि खासदारांसमोर ठेवला जाईल. तूर्तास मुंबईत कोणतीही चर्चा शक्य नाही. हसन मुश्रीफ: भाजपकडून आलेल्या प्रस्तावाची मला माहिती नाही. २९ जुलैला पार्थ पवारांचा साखरपुडा आहे. त्यानंतर आमच्या पक्षाच्या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. जयंत पाटील : विलीनीकरणाची चर्चा सुरू नाही. आमचे सर्व आमदार आणि खासदार शरद पवारांच्या पाठीशी अत्यंत निष्ठेने आणि ठामपणाने उभे आहेत. एनडीएने आम्हाला निमंत्रण दिले आहे का? त्यामुळे तिथे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संजय शिरसाट : मी केलेली सर्व भाकितं आतापर्यंत खरी ठरलेली आहेत. अनेक लोकांच्या ज्या काही भावना आहेत, त्यांचा शेवट येत्या आठ दिवसांत होईल. फक्त आठ दिवस थांबा, तुम्हाला राजकीय घडामोडींचा अंदाज येईल.
सुप्रिया सुळेंचे ८ दिवस मौन…
सोनम वांगचुक यांना भेटून आल्यावर सुप्रिया सुळेंना घशाचा तीव्र त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील आठ दिवस पूर्णपणे बोलणे टाळण्याचा आणि विश्रांती घेण्याचा कडक सल्ला दिला. स्वत: सुप्रिया यांनीच समाजमाध्यमांवर ही माहिती दिली आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता सुप्रियांचे हे राजकीय मौन असावे, अशीही चर्चा आहे.