![]()
चाकूर तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) झालेल्या कथित गैरव्यवहाराची ‘एसआयटी’मार्फत सखोल चौकशी करावी आणि शेतकऱ्यांची थकीत बिले तत्काळ अदा करावीत, या मागण्यांसाठी बालाजी पाटील चाकूरकर यांनी २० जुलैपासून शहरातील जुन्या बसस्थानकासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तालुक्यातील अजनसोंडा (बु.), कलकोटी, बावलगाव, अंबुलगा, बनसावरगाव, झरी (बु. व खु.) यांसह तब्बल ८४ गावांमध्ये मनरेगाअंतर्गत मातोश्री पाणंद रस्ते, शेततळे, विहीर, गोठा, घरकुल आदी कामे झाली आहेत. या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. तसेच, तालुक्यातील शेतकऱ्यांना सन २०२४-२५ चा पीक विमा तत्काळ देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी मनरेगाची कामे पूर्ण केली असली तरी, गेल्या एक ते दोन वर्षांपासून लाभार्थींची रक्कम थकीत आहे, ती तत्काळ द्यावी, असा आग्रह चाकूरकर यांनी धरला आहे. या उपोषणाला विविध राजकीय नेते व पदाधिकारी भेट देत असले तरी, प्रशासनाने अद्याप याची कोणतीही दखल घेतलेली नाही. उपोषणाची साधी दखलही न घेतल्याने प्रशासनावर नाराजी मनरेगा अंतर्गत शेततळे, विहीर आणि गोठ्याची कामे पूर्ण करूनही शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून घामाचे पैसे मिळालेले नाहीत. हक्काच्या पैशांसाठी आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी बालाजी पाटील चाकूरकर यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याने अद्याप उपोषणाची साधी दखलही न घेतल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त होत आहे.
Source link
मनरेगा घोटाळ्याविरोधात चाकूरमध्ये उपोषण:राजकीय नेत्यांच्या भेटी, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष