![]()
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशातील युवा पिढीच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. मात्र, विरोधी पक्षांकडे कोणतीही ठोस दृष्टी नसल्याने ते आंदोलने, अपप्रचार आणि ‘फेक नॅरेटिव्ह’च्या आडून तरुणांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, अशी खरमरीत टीका राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या युवककेंद्रित धोरणांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि सत्य जनतेसमोर आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने २७ जुलै रोजी मुंबईत ‘धन्यवाद मोदीजी’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाबाबत माहिती देताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “भारताकडे असलेली जगातील सर्वाधिक युवा शक्ती हीच देशाची मुख्य ताकद आहे. या ताकदीची जाणीव असलेल्या विरोधी व देशविरोधी शक्ती खोटे आरोप आणि अपप्रचाराच्या माध्यमातून युवकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, हा अपप्रचार आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हला उत्तर देऊन सत्य जनतेसमोर आणणे ही आमची जबाबदारी आहे.” फलकांच्या माध्यमातून प्रमुख योजनांचा प्रचार ‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या विविध महत्त्वपूर्ण शैक्षणिक व कौशल्य विकास उपक्रमांची सविस्तर माहिती फलकांच्या (बॅनर्स) माध्यमातून थेट नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. नागरिक व तरुणांना सहभागी होण्याचे आवाहन ‘धन्यवाद मोदीजी’ हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून देशाच्या युवा शक्तीने अनुभवलेल्या सकारात्मक परिवर्तनाबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता आहे, असे लोढा यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, भारतीय जनता युवा मोर्चा, महिला मोर्चाचे कार्यकर्ते, विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, सर्वांनी या कृतज्ञता सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
Source link
भाजपकडून 'धन्यवाद मोदीजी' उपक्रमाचे आयोजन:केंद्र सरकारच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवणार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती