![]()
आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा पार पडून पालखी सोहळे पंढरीच्या दिशेने पुढे सरकताच, पालखी मार्गावरील गावांमध्ये प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या व्यापक स्वच्छता मोहिमेमुळे संपूर्ण परिसर २४ तासांत अतिशय स्वच्छ आणि चकाचक झाला आहे.
.
पालखी सोहळ्यादरम्यान वाखरी, पिराची कुरोली, भांडीशेगाव या गावांमध्ये आणि पालखी मार्गावर शेकडो टन कचरा साचला होता. मात्र, पालख्या पुढे जाताच जिल्हा परिषद, पंढरपूर नगरपालिका, तालुका पंचायत समिती तसेच वाखरी व पिराची कुरोली ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. कचरा उचलल्यानंतर परिसरात आरोग्याचा धोका निर्माण होऊ नये म्हणून गावागावांमध्ये औषध फवारणी आणि धुरळणीचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या कामगिरीमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
वाखरी पालखी तळ आणि रिंगण तळापासून ते इसबावी विसाव्या पर्यंतचा सुमारे ६ किमी अवघ्या दोन दिवसांत पूर्णपणे साफ करण्यात आला. सध्या या तळावर एकही पाण्याची बाटली किंवा प्लास्टिकचा कागदही दिसत नसून परिसराला स्वच्छ रूप प्राप्त झाले आहे. उपरी | स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पालखीतळ, अंतर्गत रस्ते, मुक्कामस्थळे आणि परिसरातील सर्वत्र साचलेला कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. प्लास्टिक, पत्रावळी, पाण्याच्या बाटल्या तसेच अन्य टाकाऊ वस्तू हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यामुळे पालखीतळ परिसर पुन्हा स्वच्छ आणि नीटनेटका दिसू लागला आहे.
या मोहिमेसाठी भंडीशेगाव येथे २२५ कर्मचारी, पिराची कुरोली येथे १२५ कर्मचारी, वाखरी पालखीतळासह संपूर्ण पालखी मार्गावर स्वतंत्र स्वच्छता पथके कार्यरत होती. आळंदी आणि देहूपासून प्रत्येक गावांमध्ये २५० कर्मचारी सलग ८ दिवस स्वच्छतेच्या कामात कार्यरत आहेत. वाळवंट परिसरात १०० कर्मचाऱ्यांनी सलग २१ दिवस सेवा बजावत आहेत.