![]()
शेतकरी आत्महत्या हा देशासाठी मोठा कलंक असून त्या रोखण्यासाठी शेतकरी संरक्षण कायदा, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव आणि प्रभावी कृषी मूल्य धोरणाची तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी केले. सृजनकट्टा – ‘शोध स्वतःचा’ या वाचन चळवळीअंतर्गत नेवासे फाटा येथील कृष्णा हॉटेलमध्ये रविवारी आयोजित कार्यक्रमात डॉ. ढगे यांच्या प्रकाशित झालेल्या ‘कृषीतरंग’ या पुस्तकावर वैचारिक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य रघुनाथ आगळे होते. महेश मापारी यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या सृजनकट्टा वाचन चळवळीमध्ये विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. या उपक्रमात ‘कृषीतरंग’ पुस्तकाचे सामूहिक वाचन झाल्यानंतर त्यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. परिसंवादात बोलताना डॉ. ढगे यांनी भारत हा कृषीप्रधान देश असतानाही शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक शोषण होत असल्याची खंत व्यक्त केली. शेतकरी संरक्षण कायद्याची गरज, प्रभावी कृषी मूल्य धोरणाची अंमलबजावणी आणि समाजप्रबोधनाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच राज्याच्या कृषी मूल्य आयोगाच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी टीका केली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. किशोर धनवटे यांनी केले, तर महेश मापारी यांनी डॉ. ढगे यांचा परिचय करून दिला. परिसंवादात संजय खर्डे, राजेंद्र चौधरी, पोतदार, ॲड. स्मिता लवांडे, उपप्राचार्य वाय. बी. शेख तसेच निलेश जोशी यांनी चर्चेत सहभाग नोंदवला.
Source link
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी संरक्षण कायदा आवश्यक- ढगे:मुळा धरण 77.32 टक्क्यांवर; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित