![]()
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानावर शिवसेना नेत्या व माजी विधानपरिषद उपसभापती, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आक्रमक शब्दांत टीका केली. “सपकाळ यांच्या वक्तव्याला दोन शब्दांत उत्तर द्यायचे झाले तर ते म्हणजे ‘नसती उठाठेव’,” असा टोला त्यांनी लगावला. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, एकेकाळी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्याविरोधात विरोधक ज्या प्रकारची भाषा वापरत होते, त्याच प्रकारची टीका आज दुसऱ्यांविषयी करून नेमके काय साध्य करायचे आहे, हे सपकाळ यांनीच सांगावे. सुनेत्रा पवार यांनी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली असून, जिल्हा नियोजन समितीच्या बैठका, विधिमंडळातील कामकाज, शेतकरी, महिला तसेच राज्यातील विविध प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी अभ्यासपूर्ण आणि योग्य भूमिका मांडल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासोबतच बीड जिल्ह्याची जबाबदारीही त्यांनी सक्षमपणे सांभाळल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे “दुखतंय पोट आणि बडवतायेत डोकं,” अशी म्हण वापरत डॉ. गोऱ्हे यांनी सपकाळ यांच्या भूमिकेवर निशाणा साधला. “सुनेत्रा पवार यांनी काय करावे, याबाबत सल्ला देण्याचा प्रयत्न सपकाळ करत आहेत. पण मराठीत एक म्हण आहे, ‘सल्ला विचारला तरच द्यावा; न विचारता सल्ला देणाऱ्याला मूर्ख म्हणतात.’ त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतःच्या मूर्खत्वाचीच प्रचिती दिली आहे,” अशी घणाघाती टीका डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
Source link
नीलम गोऱ्हे यांचा हर्षवर्धन सपकाळांना खोचक टोला:सुनेत्रा पवारांवरील टीकेला 'नसती उठाठेव' म्हणत मूर्ख संबोधले