![]()
परमेश्वराएवढी जगात कोणतीही मौल्यवान वस्तू नाही, प्रेमासारखा अन्य कोणताही मार्ग नाही आणि सद्गुरूंसारखा सज्जन कोणीच नाही; हे सत्य जाणून घेऊनच प्रत्येकाने आपल्या जीवनाची वाटचाल करावी, असे प्रतिपादन आनंद चैतन्य महाराज यांनी केले. भांबरवाडी येथे अखिल भारतीय चैतन्य साधक परिवारा’च्या वतीने आयोजित सत्संग सोहळ्यात ते बोलत होते. गुरुपौर्णिमेच्या औचित्याने या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवचनादरम्यान हरी सम जग कुछ वस्तू नही, प्रेम पंथ समपंथ, सद्गुरू सम सज्जन नही, गीता सम नही ग्रंथ या संतवचनाचा सुंदर विस्तार करताना महाराज पुढे म्हणाले, भारतीय परंपरेत गुरुपौर्णिमा हा सण अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे. इतर व्यावहारिक सण विस्मृतीत जाणाऱ्या आठवणींची उजळणी करतात; मात्र गुरुपौर्णिमा हा केवळ सण नसून गुरु-शिष्याच्या पारमार्थिक आणि निस्वार्थ नात्याचा उत्सव आहे. ज्याला सच्चा गुरू आणि गुरूला पात्र शिष्य मिळतो, त्यांचे जीवन दुःखातून मुक्त होते. अगदी प्रभु श्रीराम, श्रीकृष्ण आणि भगवान बुद्धांनीही गुरूंपरंपरा पाळली. दत्तगुरूंनी २४ गुरू करून ज्ञानाचा मार्ग दाखवला. गुरूंसमोर अहंकाराला स्थान नसते; जसा बी स्वतःला मातीत गाडून घेतल्यानंतरच त्यातून सुंदर अंकुर फुटतो, तसेच अस्तित्व विसरून गुरूचरणी लीन व्हावे लागते, असेही ते यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले. या सोहळ्यास साईदास जाधव, डॉ. रविराज जाधव, सरपंच दशरथ राठोड, पदम जाधव, सुभाष जाधव, गणेश चव्हाण, शेषराव जाधव, आकाश बोलधने यांच्यासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि बुलढाणा येथून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार गोकुळ राठोड यांनी मानले. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यांच्या पाठीशी गुरूंचा आशीर्वाद असतो, तो जग जिंकू शकतो याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना नगरसेवक अब्दुल जावेद म्हणाले की, ज्यांच्या पाठीशी गुरूंचा आशीर्वाद असतो, तो जग जिंकू शकतो. गुरूशिवाय माणूस दिशाहीन होतो. सर्व धर्म व पंथांचे अंतिम सार हे ‘प्रेम’ हेच आहे. या सत्संगाला गुजरात येथील ओमानंद यादव, नगराध्यक्षा फरीन बेगम अब्दुल जावेद, गोकुळ राठोड, कुंदन राठोड, सुरेश राठोड, असद पवार, हितेश पटेल, उदयसिंग राजपूत, विलास राठोड, पदमसिंग जाधव, धर्मू पवार आदींची उपस्थिती होती. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
Source link
परमेश्वराएवढी कोणतीही मौल्यवान वस्तू नाही- आनंद चैतन्य महाराज:अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराने केले होते आयोजन