![]()
शहरातील प्राचीन महानुभाव दत्त मंदिर मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून चोकअप नालीचे दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. या मार्गावरून प्रतिष्ठान महाविद्यालय, शालिवाहन विद्यालय, दोन जिल्हा परिषद शाळा व उर्दू माध्यमिक शाळा अशा तब्बल पाच शाळांचे विद्यार्थी दररोज ये-जा करतात. रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे अनेक विद्यार्थी घसरून पडत असून त्यांचे गणवेश खराब होत आहेत, ज्यामुळे त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शहरभरात बालाजी विहार, नाथ विहार, नेहरू चौक, रेणुका देवी गल्ली, नाथ मंदिर मार्ग, स्टेट बँक समोरील रस्ता, साळीवाडा, नारळा आणि यशवंतनगर परिसरात नाल्या तुंबून दुर्गंधी पसरली आहे. शिवाय विकासकामांसाठी खोदलेला खड्डा न बुजवल्यामुळे त्यात पाणी साचून दुचाकीस्वार खड्ड्यात पडून अपघातांना आमंत्रण मिळत आहे. नगरपरिषद प्रशासन फक्त वरवर नालीची सफाई करून वेळ भागवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मार्गावरील नालीच्या पाण्याचा आणि रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक व पालकांकडून केली जात आहे.
Source link
शाळेच्या रस्त्यावर नालीचे पाणी:पैठणमधील विद्यार्थ्यांची गैरसोय, नगरपालिकेने लक्ष देण्याची मागणी