Headlines

सरकारने लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा:चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या, जिंतूरमधील भोसी गावात तरुणाने घेतला गळफास‎




मराठा आरक्षणासाठी चिठ्ठी लिहून एका 30 वर्षीय युवकाने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिंतूर तालुक्यातील बामणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भोसी येथे 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी ही घटना घडली. गणेश आश्रोबा ठोंबरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश ठोंबरे याने राहत्या घरात दोरीने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नातेवाइकांनी त्याला तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी मुंडे यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. दरम्यान, बामणी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात जाऊन प्राथमिक पंचनामा केला. मृताच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश ठोंबरे हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून अत्यंत निराश होता. याच कारणातून त्याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी बामणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हवालदार ठाकूर करत आहेत. सोमवारी, 10 ऑगस्ट रोजी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून फाशी घेतोय गणेश ठोंबरे याच्या खिशात एक सुसाईड नोट (चिठ्ठी) आढळून आली आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून मी फाशी घेत आहे. सरकारने लवकर आरक्षणाचा प्रश्न सोडवावा,’ अशा आशयाची चिठ्ठी त्याच्या खिशात सापडली. मृताच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *