![]()
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ अमरावतीत तेली समाज आक्रमक झाला आहे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, जरांगे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच जरांगे महाराष्ट्राचे मालक आहेत का? असा संतप्त सवाल देखील तेली समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मंत्री बावनकुळे यांच्यावर वारंवार होणाऱ्या टीकेमुळे तेली समाजात संतापाचे वातावरण आहे. जरांगे यांचे हे सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे समाजाचे म्हणणे आहे. या वक्तव्यांच्या निषेधार्थ अमरावती शहरातील संपूर्ण तैलिक महासंघाचे पदाधिकारी आणि समाज बांधवांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी लावून धरली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार नक्कीच आहे; मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्या लोकप्रतिनिधीला शिवीगाळ करणे, त्यांचा सार्वजनिक अपमान करणे आणि त्यांचा जातीय उल्लेख करणे हे अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजामध्ये थेट तेढ निर्माण होऊ शकते, अशी भीतीही यात व्यक्त करण्यात आली आहे. जरांगे महाराष्ट्राचे मालक आहेत का? या आंदोलनाबाबत बोलताना महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, माजी खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. तसेच, जरांगे यांचा महाराष्ट्र झाला आहे का? जरांगे महाराष्ट्राचे मालक आहेत का? असा संतप्त सवालही आंदोलक नेत्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला. रामदास तडस यांनी दिला राज्यभर आंदोलनाचा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसींचे नेते असल्याने मनोज जरांगे यांच्याकडून त्यांना मुद्दाम लक्ष्य केले जात आहे आणि हे जर थांबले नाही, तर राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रीय तेली महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस यांनी दिला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूलमंत्री म्हणून महसूल विभागात आमूलाग्र बदल केले. ब्रिटिशकालीन जाचक कायदे रद्द केले. हे कर्तृत्व बघता, ओबीसी नेते म्हणून त्यांना सतत लक्ष्य करत राहणे योग्य नाही, असे तडस यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा मराठ्यांना फक्त प्रचारासाठी वापरायचे का?:मनोज जरांगेंचा इशारा- चूक दुरुस्त करण्याच्या मागे लागा, आता तुम्हाला सोडणार नाही मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका कायम ठेवणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगलीनंतर आता ते सातारा जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. आज मायणी, मसूर आणि पाचवड येथे त्यांच्या बैठका आणि सभा होणार असून, उद्या पाटणमध्ये जाहीर सभा आणि साताऱ्यात पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारही सक्रिय झाले आहे. मराठा आरक्षण उपसमितीची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक होणार आहे. इथे सविस्तर वाचा
Source link
'जरांगे महाराष्ट्राचे मालक आहेत का?':चंद्रशेखर बावनकुळेंवरील टीकेवरून अमरावतीत तेली समाज आक्रमक