![]()
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून ये-जा करणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीत “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “जय भवानी, जय शिवाजी” अशा उद्घोषणा ध्वनीक्षेपकावरुन देण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. दिल्ली दौऱ्यावर असतांना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन विधानसभा अध्यक्षांनी त्यांना या मागणीचे पत्र दिले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे केवळ देशातील महत्त्वाचे ऐतिहासिक रेल्वे स्थानक नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य आणि राष्ट्रभक्तीच्या विचारांचे प्रतीक आहे. या स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले असून, देशभरातून दररोज हजारो प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि पराक्रमाचा संदेश देशभर पोहोचविण्याच्या दृष्टीने “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी जय शिवाजी” या उद्घोषणा महत्त्वपूर्ण ठरतील, असे राहुल नार्वेकर यांनी पत्रात नमूद केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या तसेच या स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीच्या उद्घोषणांमध्ये नियमित रेल्वे माहितीबरोबरच “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “जय भवानी, जय शिवाजी” या घोषणा समाविष्ट करण्यात याव्यात, अशी सुस्पष्ट मागणी त्यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करतांना सर्व समाजघटकांना सोबत घेतले. त्यांचे प्रशासन, शौर्य, लोककल्याणकारी धोरणे आणि राष्ट्रहिताची भूमिका आजही संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी अशा उपक्रमांचे विशेष महत्त्व आहे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे महत्त्वाचे केंद्र आहे. या स्थानकावरून देशाच्या विविध भागांत जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेगाड्यांमध्ये होणाऱ्या उद्घोषणांमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केल्यास त्यांच्या कार्याचा संदेश महाराष्ट्राबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित रेल्वे प्रशासनाला आवश्यक त्या सूचना द्याव्यात आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ये जा करणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीत या उद्घोषणा करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती राहुल नार्वेकर यांनी केली आहे. या मागणीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि स्वराज्याच्या विचारांचा जयघोष रेल्वेच्या माध्यमातून देशभर पोहोचविण्याचा एक अभिनव उपक्रम सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Source link
"CSMT वरून सुटणाऱ्या लोकलमध्ये 'शिवरायांचा' जयघोष व्हावा":विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी