![]()
अजिंठा लेणी टी पॉइंट परिसरात सध्या वन्यप्राणी येऊन वास्तव्य करत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून अस्वल येथे येऊन झाडावर थांबत आहे. आता पाच फुटांचा अजगर (इंडियन रॉक पायथॉन) येऊन बसल्याचे आढळले आहे. त्यामुळे लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.
.
अजिंठा राखीव जंगलातील गुराख्यांचा वावर, वृक्षतोड, जंगलात विनाकारण वावर यामुळे जंगलातील वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येत आहेत. अजिंठा जंगलात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. येरवी उन्हाळ्यात अन्नपाण्याच्या शोधात ते मानवी वस्तीकडे येत असतात. अशा वेळी ते पाळीव प्राण्यांवर हल्ला करतात. सध्या जंगलात भरपूर पाणीसाठा असतानाही जंगलातील प्राणी जंगलाबाहेर पडत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून अजिंठा लेणी टी पॉइंट परिसरात एका अस्वलाचा वावर वाढला आहे. ते रात्री येथेच थांबत आहे. आता याच परिसरात व्हिजिटर सेंटरजवळ सुरक्षा रक्षकांना पाच फुटांचा अजगर दिसला. हा अजगर येथे येऊन बसला होता. जाणकारांच्या मते हा अजगर भुकेला असला तर माणसांनाही गिळू शकतो.
यामुळे येथील सुरक्षा रक्षक घाबरले होते. त्यांनी काठीने जमिनीवर आवाज केल्याने तो जंगलाच्या दिशेने निघून गेला. अजिंठा राखीव जंगलातील वन्यप्राणी या परिसरात येत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. प्रचंड वृक्षतोड, विकासकामे, विविध प्रकल्प, रस्त्यांची कामे, जंगलातील मानवी अतिक्रमण व विनाकारण वावर यामुळ वन्यजीवांचा डोंगर तथा जंगलातील अधिवास नष्ट होत आहे. सह्याद्रीची उपरांग असलेल्या अजिंठा डोंगरात अस्वल, अजगर ,वाघ, बिबट्या, लांडगे, कोल्हा या वन्यजीवांचा मुक्त व निकोप अधिवास आहे, तो जपणे पर्यटकांसह प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. {डॉ. संतोष पाटील, वन्यजीव संवर्धक, अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड
प्रचंड वृक्षतोड, विकासकामे, विविध प्रकल्पांमुळे जंगल झाले कमी