Headlines

साध्या गोष्टींतून विनोद टिपता यावा: म. भा. चव्हाण:आदिश जैन फाउंडेशनच्या हास्यकविता महोत्सवात बंडा जोशींच्या सादरीकरणाला दाद




पुण्यातील आदिश जैन फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित हास्यकविता महोत्सवात ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांनी ‘साध्या गोष्टींतून विनोद टिपता यावा’ असे मत व्यक्त केले. या महोत्सवात हास्यकवी बंडा जोशी यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. म. भा. चव्हाण म्हणाले की, ज्येष्ठांनी शिकणे थांबवल्यास त्यांना भवितव्य नाही. जगण्यात अस्सलियत असेल तर गझलेत गझलियत आपोआप येते. हास्यातून आयुष्याला न्याय देता येतो, असेही त्यांनी नमूद केले. नवी पेठेतील लोकमान्य वाचनालयाजवळील अक्षरवेल सभागृहात हा महोत्सव पार पडला. यावेळी ज्येष्ठ हास्यकवी बंडा जोशी, श्रीपाल ललवाणी, वंदना ललवाणी आणि आदिश जैन फाउंडेशनच्या प्रमुख कवयित्री मृणाल जैन उपस्थित होत्या. आदिश जैन फाउंडेशनने या महोत्सवाअंतर्गत खुली हास्यकविता लेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला देश-विदेशातून मोठा प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध हास्यकवी बंडा जोशी यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. महोत्सवाच्या पहिल्या सत्रात स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. हास्यकविता स्पर्धेत राजेश पारसनीस (सुरत) यांनी प्रथम, तर कल्पना मोडक (ठाणे) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. अनिल घोटकर (पुणे) आणि शुभदा अभ्यंकर (पुणे) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. गझल स्पर्धेत हेमंत डांगे (कोल्हापूर) प्रथम, प्रविण बोधुलकर (पनवेल) द्वितीय, तर मनोहर वाळींबे (ठाणे) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. विडंबन स्पर्धेत मुकुंद देशपांडे (वर्धा) प्रथम, मकरंद घाणेकर (पुणे) द्वितीय, तर वर्षा बालगोपाल (पुणे) आणि डॉ. मनोज वराडे (सांगली) यांना उत्तेजनार्थ गौरविण्यात आले. यावेळी बोलताना बंडा जोशी म्हणाले की, कविता लिहिणे हे सर्वात अवघड काम आहे. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय मांडणे कठीण असते. कविता लेखनासाठी कला, कौशल्य आणि समृद्ध शब्दसंपदा आवश्यक आहे. योग्य शब्दांचा योग्य ठिकाणी वापर करता आला पाहिजे. जितके अधिक वाचन कराल, तितके चांगले लिहिता येईल. वाचन आणि कविता ऐकण्याच्या सरावातून हे कौशल्य विकसित होते. विनोदी कविता आणि विडंबनांचे नियमित वाचन केल्यास या साहित्यप्रकाराची जाण वाढण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले. मृणाल जैन यांनी आदिश जैन फाउंडेशनच्या वर्षभरातील विविध उपक्रमांची माहिती दिली. संस्थेमार्फत गरजू व्यक्तींना मदत केली जाते आणि गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारले जाते. यापुढेही मराठी साहित्याचे दर्जेदार कार्यक्रम फाउंडेशनतर्फे राबवले जातील, असे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *