![]()
परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने खरीप पिके अखेरच्या घटका मोजत आहेत. अर्धा पावसाळा संपूनही परिसरातील नद्या, नाले, ओढे व विहिरी अजूनही कोरड्याठाक पडल्या आहेत. समाधानकारक पाऊस न झाल्याने आता बळीराजाचे डोळे दमदार पावसाकडे लागल
.
सुरुवातीच्या समाधानकारक पावसावर सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, मका, तूर आदी पिके बहरली होती. मात्र, ऐन फुलोऱ्यात आणि वाढीच्या काळातच पावसाने खंड दिला. यामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडून फुलोरा गळू लागला आहे. पिकांना लागलेली ही घरघर पाहता यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. परिसरातील बहुतांश शेती ही पावसावर अवलंबून असून जमीन हलकी व बरड आहे. जमिनीत ओलावा नसल्याने भूजल पातळी कमालीची खालावली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मर्यादित सिंचनाची सोय आहे, त्यांनाही कापूस व सोयाबीन वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या शेतकरी रासायनिक खते, तणनाशक आणि कीटकनाशक फवारणी करून पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहेत.
वन्य प्राण्यांचा उपद्रव; रात्रीची राखण सुरू ः एकीकडे पावसाची ओढ असताना दुसरीकडे वन्य प्राण्यांच्या झुंडी उभ्या पिकांवर ताव मारत आहेत. रोही (नीलगाय), हरणे आणि रानडुकरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिवसभर शेतात राबल्यानंतर रात्री-अपरात्री आपला जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना दिवसा आणि रात्रीच्यावेळी पिकांची राखण करावी लागत आहे.
पीकविमा संरक्षणासाठी विमा महागला पूर्वी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना केवळ एक रुपयामध्ये पीकविमा उपलब्ध करून दिला जात होता. मात्र, गेल्या वर्षीपासून पीक विम्याच्या दरात वाढ झाल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या अल्पभूधारक व सर्वसामान्य शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवण्याकडे चक्क पाठ फिरवली आहे. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास भरपाई कशी मिळणार असा हा राज्यातील सर्वच शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठा निर्माण झाला आहे.