![]()
‘जेन झी’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशातील तरुणाईशी थेट संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारने ‘युवा कनेक्ट’ या अभियानाची तयारी केली आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त २७ ऑगस्ट रोजी देशभरातील सुमारे १,६०० ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी माध्यमातून ८ लाखांहून अधिक तरुणांशी संवाद साधणार आहेत. तरुणांचा सामाजिक सहभाग वाढवणे, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणे आणि भविष्यातील युवा नेतृत्वाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या अभियानामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले. माय भारत महाराष्ट्रचे राज्य संचालक अमित पुंडे यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची माहिती दिली. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. त्याच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधी ‘युवा कनेक्ट’च्या माध्यमातून देशभरातील तरुणांना एका व्यासपीठावर जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यक्रम तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्येही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईतील आयआयटी पवई येथे केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी सहभागी होणार आहेत. पुण्यात केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तर भुसावळ येथे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात युवकांना खेळाडू, खासदार, आमदार, मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. गेल्या काही वर्षांत देशातील क्रीडा क्षेत्र आणि पायाभूत सुविधांमध्ये झालेला बदल तरुणांसमोर मांडतानाच त्यांच्या अपेक्षा, अडचणी आणि भविष्यातील कल्पना जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आयआयटी, सिम्बायोसिस, एम्ससह महाविद्यालयांचा सहभाग ‘युवा कनेक्ट’साठी आयआयटी पवई, सिम्बायोसिस आणि एम्स नागपूर यांसारख्या संस्थांसह प्रत्येक जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांचा समावेश केला जाणार आहे. विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडूही या उपक्रमात तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत. संकेत सरगर, स्वप्नील कुसाळे, रुझा भोसले, प्रीतम साळवे, फाल्गुनी पिल्लई आणि पूर्वा जाधव यांच्यासह अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत. क्रीडा ते राष्ट्रनिर्माण; चार मुद्द्यांवर चर्चा कार्यक्रमात क्रीडा परिसंस्था अधिक मजबूत करणे, २०३६च्या ऑलिम्पिकसाठी वैज्ञानिक पद्धतीने क्रीडा प्रतिभा शोधणे, शासन प्रक्रियेत युवकांचा अर्थपूर्ण सहभाग वाढवणे आणि विकसित भारतासाठी कौशल्य, स्वयंसेवा व राष्ट्रनिर्माणाला चालना देणे या चार प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. तरुणांच्या सूचना आणि कल्पना थेट सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी क्यूआर कोडच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने माहिती संकलित केली जाणार आहे. याशिवाय सहभागी तरुणांसाठी ‘व्हीबीवायएलडी क्विझ’चेही आयोजन करण्यात आले आहे. ‘जेन झी’च्या बदलत्या अपेक्षा आणि तरुणाईचा वाढता सामाजिक-राजकीय सहभाग लक्षात घेता केंद्र सरकारने या अभियानाच्या माध्यमातून तरुणांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. त्यामुळे ‘युवा कनेक्ट’च्या माध्यमातून सरकार तरुणांपर्यंत कितपत प्रभावीपणे पोहोचते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पत्रकार परिषदेला माय भारत मुंबईचे उपसंचालक अनूप इंगोले आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे उपसंचालक माधव कांबळे उपस्थित होते. हेही वाचा.. आदिवासी वसतिगृहातील प्रवेशासाठी वयाची अट रद्द:पुण्यात 13 दिवसांच्या आंदोलनानंतर सरकारकडून मोठी घोषणा, मात्र इतर मागण्यांवर विद्यार्थी ठाम आदिवासी विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर आणि वाढत्या राजकीय दबावानंतर अखेर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेली 30 वर्षांची वयोमर्यादा रद्द करण्यात आल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केली आहे. सर्वपक्षीय आदिवासी आमदार आणि खासदारांसोबत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर 14 ऑगस्ट 2026 रोजीच्या शासन निर्णयातील (GR) वयाची अट शिथिल करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा
Source link
'जेन झी'ला साद घालण्यासाठी केंद्राची मोठी मोहीम:'युवा कनेक्ट'द्वारे पंतप्रधान मोदी साधणार 8 लाख तरुणांशी संवाद, देशभरातली 1600 ठिकाणी महासोहळा