![]()
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी आपले 11 वे आमरण उपोषण सुरू केले असून, दुसरीकडे ओबीसी समाजानेही उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत, संघर्षाचा मार्ग सोडून चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे. “समाजाला न्याय देण्याची शासनाची भूमिका असून, सरकारने जरांगेंच्या मागण्यांना वेळोवेळी प्रतिसाद दिलेला आहे,” असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. जातपडताळणी सर्वांसाठीच मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील जातपडताळणी समित्या रद्द करण्याची नवी मागणी पुढे केली आहे. यावर भाष्य करताना अशोक चव्हाण म्हणाले की, शासनाने आरक्षणाचा विषय बऱ्यापैकी पूर्ण केला आहे. जातपडताळणी ही कुठल्या एका विशिष्ट समाजासाठी किंवा केवळ मराठा समाजालाच लागू नाही. एससी (SC), एसटी (ST) आणि ओबीसी (OBC) अशा सर्वच प्रवर्गांसाठी जातपडताळणीची प्रक्रिया अस्तित्वात असते. संघर्षाचा मार्ग सोडावा जरांगे पाटील यांच्या 11व्या उपोषणाबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, सरकारने त्यांच्या मागण्यांना प्रतिसाद दिला असल्यामुळे, थेट उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याअगोदर चर्चेची एक बैठक व्हायला हवी होती. आंदोलनामुळे लोकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. शासनाने समाजाला न्याय देण्याची भूमिका स्वीकारलेलीच आहे, त्यामुळे संघर्षाचा मार्ग सोडायला हवा. ओबीसी आंदोलनावरही प्रतिक्रिया एकीकडे जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना, ओबीसी समाजानेही आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावर बोलताना चव्हाण यांनी सामंजस्याची भूमिका मांडली. हा विषय आता दोन्ही बाजूंकडून तसाच पुढे येत आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढवण्याऐवजी, दोन्ही बाजूंशी संवाद साधून चर्चेतूनच मार्ग काढणे योग्य ठरेल, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. हेही वाचा.. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस:12 तारखेपर्यंत मुंबई गाठा, फक्त आझाद मैदान-वर्षा बंगल्याकडे जाऊ नका; जरांगेंचे मराठा बांधवांना आवाहन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील 11व्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना आजपासूनच १२ तारखेपर्यंत मुंबईत पोहोचण्याचे आवाहन केले आहे. “थेट आझाद मैदानात जाऊ नका. मराठे मुंबईत आल्याचे कोणालाही समजता कामा नये. पुढील १२ दिवस हे सत्र सुरू ठेवा आणि आपापल्या पाहुण्यांकडे किंवा मित्रांकडे मुक्काम करा,” अशी सूचना जरांगेंनी दिली आहे. जर पोलिसांनी कारवाई करून उचलून नेले, तरी न घाबरता बिनधास्त पोलिस स्टेशनमध्ये राहा, तिथेच तुमची राहण्याची सोय होईल आणि कोणाकोणाला उचलले हे मी नंतर बघतो, असेही जरांगे म्हणाले. सविस्तर वाचा
Source link
संघर्षाचा मार्ग सोडा, लोकांची गैरसोय टाळा:समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका, चर्चेतूनच मार्ग काढू; जरांगेंच्या उपोषणावर अशोक चव्हाणांचे आवाहन