Headlines

दिलीपराव देशमुख यांना 'जय वैभवलक्ष्मी सहकार भूषण' पुरस्कार:केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुण्यात गौरव, सहकार क्षेत्रातील कामाचे कौतुक




माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना ‘जय वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुण्यात एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. मोहोळ यांनी यावेळी दिलीपराव देशमुख यांच्या सहकार क्षेत्रातील कामाचे कौतुक केले. ‘जय वैभवलक्ष्मी फाउंडेशन’, पुणे यांच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात हा पुरस्कार सोहळा झाला. यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे. लातूरचे सहकार क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख ही महाराष्ट्राच्या राजकारणासह सहकारातील आदर्श जोडी आहे.’ मोहोळ पुढे म्हणाले, ‘दिलीपराव देशमुख यांचे सहकार क्षेत्रातील काम मोठे आहे. त्यांच्या सन्मानामुळे पुणे आणि लातूरचे नाते अधिक मजबूत झाले आहे.’ फाउंडेशनचे अध्यक्ष उल्हास पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, माजी आमदार संजय जगताप, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर उपस्थित होते. फाउंडेशनचे संस्थापक प्रा. डॉ. व्ही. एस. अंकलकोटे पाटील, जय वैभवलक्ष्मी ग्रुपचे अध्यक्ष ॲड. सौरभ अंकलकोटे पाटील, उपाध्यक्ष डॉ. शशिकांत पागे, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, भाग्यश्री अंकलकोटे पाटील, डॉ. स्वरूप एकलुरे आणि ॲड. मिथुन गुरव हे मान्यवरही उपस्थित होते. मुरलीधर मोहोळ यांनी केंद्र सरकारच्या सहकार क्षेत्रातील कामांची माहिती दिली. ते म्हणाले, ‘केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशात सहकार क्षेत्रात मोठे काम सुरू आहे. देशातील ८० हजार प्राथमिक कृषी सहकारी सोसायट्यांचे (पॅक्स) संगणकीकरण करण्यात आले आहे. त्यांना उत्पन्नाचे अनेक मार्ग उपलब्ध करून दिले जात आहेत.’ ‘बीज से बाजार तक’ योजनेअंतर्गत तीन मल्टिस्टेट सोसायट्या आणि ६९ हजार मेट्रिक टन क्षमतेची गोदामे तयार केली जात आहेत. साखर कारखान्यांच्या प्राप्तिकराचा जुना प्रश्न सोडवण्यात आला आहे. एनसीसीडीसीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना ११ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. मोहोळ यांनी सांगितले की, ‘पुढील १० वर्षांत सहकार क्षेत्रासाठी लागणारे २० लाख कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे ध्येय आहे. हे काम नवीन सहकार विद्यापीठाच्या माध्यमातून केले जाईल.’ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘विलासराव देशमुखांच्या निधनानंतर दिलीपरावांनी लातूर जिल्ह्याला खंबीरपणे मार्गदर्शन केले. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून सामान्य लोकांना सक्षम केले आहे.’ ‘त्यांच्या नेतृत्वाखाली लातूरची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशातील साडेचारशे बँकांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या बँकेने यांत्रिक शेती (मेकनाइज्ड फार्मिंग) आणण्याचे महत्त्वाचे काम केले आहे,’ असे पाटील यांनी सांगितले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही विलासराव देशमुख आणि दिलीपराव देशमुख यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. ते म्हणाले, ‘विलासराव आणि दिलीपराव यांनी समन्वयातून सहकारात शिस्त आणली आणि तरुण पिढीला योग्य दिशा दिली.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *