![]()
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “अमित शाह हे मुंबईत केवळ फंड कलेक्शनसाठी येतात. मुंबईत बिल्डर, जमिनीचे व्यवहार करणारे लोक आणि हजारो कोटींच्या थैल्या असल्याने ते येथे रमतात,” असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. सोबतच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत, त्यांच्या भाषेवर आक्षेप घेणाऱ्या राज्य सरकारचा राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘शहांनी १०० गाड्यांचा ताफा घेऊन फिरू नये’ अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधताना राऊत म्हणाले की, “मुंबई ही गजबजलेली आहे. सणासुदीत लोकांना बाहेर पडावे लागते. अशा वेळी गृहमंत्र्यांनी १०० गाड्यांचा ताफा घेऊन फिरू नये. मुंबईतील लोक पापभिरू आहेत, ते कुणालाही हात लावत नाहीत. तुम्ही १-२ गाड्या घेऊन फिरलात तरी तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही असे काही महान राष्ट्रकार्य केलेले नाही की आंतरराष्ट्रीय शक्ती तुमच्या जीवावर उठलेल्या आहेत.” तसेच, शाह लालबागच्या राजासोबतच उद्योगपतींच्या गणपतीच्या व्यवस्थेसाठी थांबले आहेत का, असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. जरांगेंच्या भाषेचे समर्थन मनोज जरांगे पाटील यांच्या ‘मुंबई चलो’ आंदोलनावर बोलताना राऊतांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला. “जरांगे शिवराळ भाषा वापरतात म्हणून त्यांच्याशी चर्चा होत नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. पण पुण्यात विद्यानंद बापट हे अत्यंत सभ्य आणि संस्कारी भाषेत आंदोलन करतात. मग त्यांच्यावर सरकार पुरस्कृत गुंडांनी हल्ला का केला?” असा सवाल राऊत यांनी विचारला. बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीचा संदर्भ देत, “ज्याला जी भाषा कळते तीच वापरावी, जर सरकारला शिवीची भाषा कळत असेल, तर तीच भाषा वापरायला पाहिजे,” असे म्हणत त्यांनी जरांगेंच्या भाषेचे समर्थन केले. पंतप्रधानांच्या ‘सेवा अभियाना’वर टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी राबवल्या जाणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’वरही राऊतांनी जोरदार टीका केली. “गेल्या २५ वर्षांत त्यांनी कुणाची सेवा केली, हे देशाने पाहिले आहे. दोन-चार उद्योगपतींची सेवा करण्यापलीकडे, त्यांची लाखो कोटींची कर्जे माफ करण्यापलीकडे आणि देशाची सार्वजनिक संपत्ती मातीमोल भावात विकण्यापलीकडे त्यांनी कोणतीही सेवा केलेली नाही,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला. ———- ही बातमी पण वाचा.. कायदेशीररित्या मुंबईच्या वेशीवर तटबंदी करणार!:सदावर्तेंचा इशारा, म्हणाले- जरांगेंनी दोन जन्म घेतले तरी मागणी मान्य होणार नाही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या ‘मुंबई चलो’ आंदोलनावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. जरांगेंची मागणी कधीच मान्य होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागून मुंबईत येणार नाही असे जाहीर करावे, अशी थेट मागणी सदावर्ते यांनी केली आहे. सविस्तर वाचा
Source link
अमित शहांनी सणासुदीत मुंबईत 100 गाड्यांचा ताफा घेऊन फिरू नये:राऊतांचा टोला; जरांगेंच्या भाषेचे समर्थन करत राऊतांचे सरकारवर टीकास्त्र