![]()
मानधनाऐवजी दरमहा ३० हजार रुपये वेतन, वार्षिक करारनामा, फिटनेस सर्टिफिकेट व अन्न शिजविण्याची परवाना पद्धत बंद करण्यासह विविध मागण्यांसाठी शालेय पोषण आहार कर्मचारी २८ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार आहेत. या दिवशी जिल्ह्यातील कुठल्याही शाळेत पोषण आहार शिजविला जाणार नसल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. सीआयटू संलग्न शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने निफाडचे गटशिक्षणाधिकारी विलास साळी व शालेय पोषण आहार अधीक्षक गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक दशकांपासून कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर आहार शिजविण्याचे काम करीत असून, सध्या त्यांना अवघे ८३ रुपये दैनंदिन मानधन मिळते. हे काम जोखमीचे असून, त्याशिवाय शाळेत इतर कामेही करून घेतली जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. शालेय पोषण आहाराव्यतिरिक्त इतर कामे देऊ नयेत, दरमहा ३० हजार रुपये वेतन, दिवाळीसाठी ५ हजार रुपये बोनस, सर्व कर्मचाऱ्यांचा विमा व डिलेव्हरी रजा द्यावी, तसेच योजनेतील मदतनिसांना दरमहा २० हजार रुपये वेतन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. वार्षिक करारनामा, फिटनेस सर्टिफिकेट व अन्न शिजविण्याचा परवाना पद्धत बंद करावी, इंधनखर्च, भाजीपाला व पूरक आहाराचे बिल पंचायत समिती स्तरावरून थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, अशीही मागणी आहे. निवेदन देताना संघटनेचे नाशिक जिल्हा सरचिटणीस सुदाम पावडे, आरीफ इनामदार, निफाड तालुका अध्यक्ष विनायक वाघ, संगीता शिंदे, केदारनाथ नागरे, मनीषा जाधव आदींसह कर्मचारी उपस्थित होते. मागण्या रास्त; शासनाकडे प्रस्ताव पाठवू ^ कर्मचारी जास्त वेळ आणि जोखमीचे काम करतात. त्यामुळे त्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्यांना वेळेवर मानधन मिळाले पाहिजे. दरमहा वेतन मिळावे यासाठी शासनाकडे प्रस्ताव आणि तुमचे निवेदन पाठवू. – विलास साळी, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, निफाड
Source link
मानधन नको, 30 हजार वेतन द्या:शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा; 28 राेजी भव्य माेर्चा