![]()
गंगापूर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दिलेल्या ओढीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सुरुवातीच्या पाऊसानंतर पडलेला मोठा खंड आणि काही ठिकाणच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत बंब यांनी शुक्रवारी खडकनारळा परिसरात भुईमूग, मका व बाजरीच्या पिकांची पाहणी केली. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून, वेळेवर पाणी न मिळाल्यास उत्पादनात मोठी घट होईल, अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पाहणीदरम्यान आमदार बंब यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या कामात अडथळे येणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. अधिकारी मुख्यालायी उपलब्ध नसल्यास तक्रारी नोंदवण्याचे आवाहनही केले. पावसाची स्थिती पाहता पशुधनासाठी चारा व पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी जनावरांची विक्री करू नये. त्यांच्या संगोपनासाठी चारा छावण्या सुरू करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच तालुक्यातील परिस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ. बंब यांनी स्पष्ट केले. या पाहणीवेळी तालुका कृषी अधिकारी बाबुराव जायभाय, मंडळ कृषी अधिकारी निवृत्ती झोरी, सभापती शेषराव जाधव, भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, बाजार समिती संचालक सुरेश जाधव, गोपाल वर्मा, भाऊसाहेब नेमाने, एम. डी. थोरात, अंबादास गायके आणि भगवान गाढे उपस्थित होते.
Source link
खडकनारळात पावसाच्या खंडाने पिकांवर संकट:आ. प्रशांत बंब यांच्याकडून पाहणी