![]()
प्रतिनिधी | अकोट कोणत्याही समाजाने त्यांचा इतिहास विसरू नये, कारण समाजाचा दैदिप्यमान इतिहास विसरला की, त्याचा भूगोल बिघडतो आणि त्यानंतर त्या समाजाची झपाट्याने अधोगती होते, ब्राह्मण समाज सुद्धा याला अपवाद नाही, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार अंकित काणे यांनी येथे केले. स्थानिक सर्वभाषिक परशुराम जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित भगवान परशुराम जयंती सोहळ्यात अंकित काणे बोलत होते. आशा जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. अमरावती जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या सदस्य अमृता पुराडूपाध्ये, डॉ. सूरज व्यवहारे, नगरसेवक निलेश नवघरे, सुधाबेन राजगुरू, स्वप्नलक्ष्मी पांडे, राधेश्याम व्यास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परशुराम जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वभाषिक समितीच्या वतीने भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. स्थानिक श्री नरसिंग मंदिरातून शोभायात्रेला सुरुवात झाली. गावातील प्रमुख मार्गावरून फिरुन शोभायात्रा परत श्री नरसिंग मंदिरात आली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात अंकित काणे बोल होते. काणे म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून ब्राह्मण समाज हा पुरोगामी आहे. थोरल्या माधवराव पेशव्यांपासून लोकमान्य टिळक, आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, मंगल पांडे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे आदी अनेक नावे सांगता येतील. या व अशा महापुरुषांचा वैचारिक वारसा पुढे चालवायचा आहे. ब्राह्मण समाजाने सर्व क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवावा. राजकारण, समाजकारण, उद्योग, व्यवसाय, तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रात सहभाग घेऊन समाजासह राष्ट्राची उन्नती साधावी, असे कळकळीचे आवाहन पत्रकार अंकित काणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्षितीज पारसकर, चैतन्य भागवत, आनंद कारणकार, सर्वेश आसरकर, निलेश तिवारी, गौरव आसरकर, कैवल्य जोत, पार्थ देवळे, भार्गव जोशी, देवा दुबे, अमोल जती, शशांक भावे, मोहित काशीकर, प्रसाद ठक्कर, दर्शन ठक्कर, प्रसाद पाटील, पियुष शर्मा, चेतन शर्मा, केदार पांडे, चिन्मय आष्टीकर, आदित्य जोशी, अंकित जोशी, अथर्व मानेकर, विक्रांत पाटील, रोहित महाजन, भार्गव पोफळी, आदित्य पांडे आदींनी परिश्रम घेतले. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रमाच्या अध्यक्षा आशा जोशी यांनी कौटुंबिक मूल्ये जोपासण्यावर भर दिला. मुलींना प्रोत्साहन द्या परंतु त्यांना वाईट प्रवृत्तीपासून वाचवण्यासाठी सक्षम करा, असे आवाहन आशा जोशी यांनी केले. या प्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ज्योत्स्ना अनसिंगकर यांनी केले तर चेतन देवळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली. कार्यक्रमाला सर्वभाषिक ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Source link
कोणत्याही समाजाने त्यांचा इतिहास विसरता कामा नये- अंकित राणे:अकोट येथे परशुराम जयंती सोहळा,सर्वभाषिक समितीतर्फे शोभायात्रा