![]()
सावरगाव फाटा ते नांदगाव खंडेश्वर दरम्यानचा आठ किलोमीटर लांबीचा मुख्य रस्ता गेल्या पाच वर्षांपासून रखडलेला आहे. रस्त्यावरील पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी, मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, रोजंदारी कामगार, नागरिक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. हा रस्ता सध्या खड्डेमय आणि धोकादायक अवस्थेत पोहोचला आहे. काही ठिकाणी रस्ता गुळगुळीत असला तरी, अनेक ठिकाणी तो पूर्णपणे फुटून चाळणीसारखा झाला आहे. अमरावती आणि इतर गावांमधून नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पोहोचण्यासाठी हा सर्वात जवळचा आणि महत्त्वाचा मार्ग आहे. रस्त्याच्या या दयनीय स्थितीमुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात मोडतोड होत आहे. अपघातांचा धोका वाढला असून, प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे दैनंदिन जीवनावर आणि शेतीच्या कामांवरही परिणाम होत आहे. स्थानिक नागरिक प्रशासनावर संतप्त आहेत. “पुलाचे काम झाले, मग रस्त्याचे का नाही?” असा थेट सवाल ते विचारत आहेत. नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. ही मागणी वेळेत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. या महत्त्वाच्या रस्त्याची तातडीने दखल घेऊन दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे मत सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
Source link
सावरगाव फाटा ते नांदगाव खंडेश्वर रस्ता 5 वर्षांपासून रखडला:पुलाचे काम पूर्ण, प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी त्रस्त