Headlines

नसरापूर चिमुरडी हत्याकांड:नुसते आश्वासन नको, कृती हवी; नराधमाला तात्काळ फाशी देऊन देशाला संदेश द्यावा – सुप्रिया सुळे




भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले असून, केवळ आश्वासने नको तर कृती हवी, अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. “महाराष्ट्रात महिलांशी गलिच्छ कृत्य करणाऱ्याला तातडीने फाशीची शिक्षा मिळते, असा संदेश सरकारने देशाला द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे. नसरापूर येथे एका ६५ वर्षीय नराधमाने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले. भीमराव कांबळे या आरोपीने एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला ‘वासरू दाखवतो’ असे आमिष दाखवून गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. एवढेच नव्हे तर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. नेमके काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? सदरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आश्वासन नकोय, कृती हवीये. महाराष्ट्राने प्राधान्य सुरू करावे आणि देशाला दाखवावे की, जर महाराष्ट्रात कुठल्याही महिलेशी किंवा नागरिकाशी गलिच्छ कृती कोणी केली, तर त्याला तातडीने फाशीची शिक्षा हे राज्य देईल. असा संदेश देणे आम्हाला राज्याच्या सरकारकडून अपेक्षित आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पोलिसांच्या वर्दीची भीती राहिली नाही? चाकणमध्ये देखील नरसापूर येथील घटनेसारखी घटना घडलीये. एका मुलावर लैगिंक अत्याचार करून, त्याची गळा चिरून हत्या केली. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. वर्दीची भीती राहिलीच नाही. ही विकृती कशी वाढतीये. आम्हाला महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पण मग त्या वर्दीची या विकृतीला, सामान्य माणसाला का भीती राहिली नाही? म्हणून काहीतरी ॲक्शन घेणे गरजेचे आहे आणि ते केले पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आरोपीला जामीन मिळालाच कसा? आरोपी भीमराव कांबळे याच्यावर यापूर्वीही तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. यावर प्रश्न उपस्थित करताना सुळे म्हणाल्या, याबाबत माहिती घेतोय. आधीच्या गुन्ह्यानंतर आरोपीला जामीन मिळालाच कसा? या माणसाला त्यांच्या गावातून हाकलून दिले होते. असे असताना तो माणूस नसरापूरमध्ये आलाच कसा? पोलिसांनी का लक्ष दिले नाही? त्याला पहिल्या गुन्ह्यांमध्ये जामीनच कसा मिळाला हा मुद्दा आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मंगळवारी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट नसरापुरातील घटनेतील आरोपीला शिक्षा देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. जोपर्यंत मुलीला आणि पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी वेळ दिली आहे. आम्ही नसरापुरातील सगळे ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहोत. मुख्यमंत्री स्वत: वकील आहेत. तसेच राज्याचे गृहमंत्री देखील आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *