![]()
वाढदिवस आणि जयंती साजरी करताना केवळ जल्लोष न करता, सामाजिक बांधिलकी जपत निघोज येथे एक कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला. वृक्षप्रेमी पोपटराव रसाळ आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने निघोज येथील स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देण्यात आला. निघोज ग्रामीण संस्था परिवाराचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाबासाहेब कवाद यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त, तसेच मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ, जी.आर.एल. कन्स्ट्रक्शनचे मालक गणेशशेठ लामखडे आणि विराज जालिंदर रसाळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. स्मशानभूमी परिसरात ‘अर्जुन’ जातीच्या वृक्षांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मळगंगा ट्रस्टचे अध्यक्ष वसंत कवाद, अमृता रसाळ, संतोष रसाळ, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, वृक्षप्रेमी पोपटराव रसाळ, गणेशशेठ लामखडे, विराज रसाळ, रवीशेठ रणसिंग, दत्तात्रय रसाळ आणि गोसावी बुवा यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोपटराव रसाळ म्हणाले, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रेरणेतून निघोज आणि परिसरात सर्वाधिक वृक्षारोपण करण्याचा आमचा संकल्प आहे. स्मशानभूमी परिसरात शेकडो झाडे लावून स्व. बाबासाहेब कवाद यांच्या आशीर्वादाने हा सेवाभावी उपक्रम आम्ही पूर्णत्वास नेत आहोत. शिववाडी आणि रसाळवाडी परिसरात यापूर्वीच हजारो झाडांचे जतन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी कन्हैया दूध समूहाचे संस्थापक स्व. शांताराम मामा लंके, स्थानिक उद्योजक, ग्रामपंचायत आणि विविध सहकारी संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. “वृक्षारोपण ही केवळ फॅशन नसून ती काळाची गरज आहे,” असे मतही रसाळ यांनी यावेळी मांडले.
Source link
निघोजच्या स्मशानभूमीत बहरणार "स्मृतींचे वन':वाढदिवस, जयंतीचे औचित्य: पोपटराव रसाळ यांच्या संकल्पनेतून हजारो झाडांचे जतन