राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची आज जयंती. त्यांच्या निधनानंतरची ही पहिलीच जयंती असून, राज्य सरकारने नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे दरवर्षी 22 जुलै रोजी अजित पवार यांची जयंती राज्यभर
.
महाराष्ट्राच्या राजकारणात आपला एक वेगळाच दरारा निर्माण करणारे, प्रशासनावरील घट्ट पकडीसाठी ओळखले जाणारे आणि कार्यकर्त्यांमध्ये ‘दादा’ या नावाने लोकप्रिय असलेल्या अजित पवारांचे याच वर्षीच्या सुरुवातीला, 28 जानेवारी 2026 रोजी एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. आज संपूर्ण राज्य त्यांना शासकीय आणि सामाजिक पातळीवर आदरांजली वाहत आहे. त्यानिमित्ताने अजित पवार नेमके कोण होते? त्यांचे अफाट कार्य, राजकीय कारकीर्द आणि त्यांच्या अचानक जाण्याने राजकारणात आलेले बदल, यांचा घेतलेला हा खास आढावा…

1995 मध्ये अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले.
अजित पवारांचे वडील होते चित्रपटसृष्टीशी संबंधित
अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला होता. ते शरद पवार यांचे मोठे भाऊ अनंतराव पवार यांचे सुपुत्र होत. अजित यांचे वडील चित्रपटसृष्टीशी संबंधित होते आणि मुंबईतील व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओमध्ये काम करत होते.
पवारांचे आजोबा, गोविंदराव पवार, बारामतीत सहकार क्षेत्रात काम करत होते आणि त्यांच्या आजी शेती सांभाळत होत्या. अजित पवार यांच्या मोठ्या भावाचे नाव श्रीनिवास आहे. श्रीनिवास कृषी आणि ऑटोमोबाइलशी संबंधित मोठे व्यावसायिक आहेत. असे म्हटले जाते की अजित पवार नेहमी आपल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये मोठ्या भावाचा सल्ला घेत असत.
त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, बारामती येथून आपले प्राथमिक शिक्षण घेतले. कॉलेजमध्ये असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. अजित पवार यांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून पदवी संपादन केली.

राजकीय प्रवास: सहकारातून सुरुवात; 6 वेळा उपमुख्यमंत्री
सहकारातून सुरुवात: 1982 मध्ये साखर कारखान्याच्या संचालक मंडळातून त्यांनी आपल्या प्रवासाचा श्रीगणेशा केला. पुढे 1991 मध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बनले आणि तिथून त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. ते 16 वर्षे पुणे जिल्हा सहकारी बँकेचे (पीडीसी) अध्यक्ष राहिले.
बारामतीचे खासदार, शरद पवारांसाठी जागा सोडली
1991 मध्ये ते बारामतीतून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. पण काका शरद पवारांसाठी त्यांनी अवघ्या काही महिन्यांतच राजीनामा दिला. येथूनच निवडून शरद पवार पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री बनले. 1996 ते 2004 पर्यंत शरद पवार बारामतीमधून खासदार राहिले. पुढे त्याच वर्षीच्या पोटनिवडणुकीत अजित पवार बारामतीतून विधानसभेवर गेले. तर 1995 मध्येही ते बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्येही ते याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. सलग सातहून अधिक वेळा ते बारामतीतून निवडून आले. 1999 मध्ये विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये त्यांना जलसंपदा विभागात कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले.

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना अजित पवार
उपमुख्यमंत्रिपदाचा रेकॉर्ड: 1992 साली त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद मिळाले. त्यानंतर त्यांनी कृषी, जलसंपदा, ग्रामविकास, ऊर्जा आणि अर्थ यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक, म्हणजेच तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा विक्रम दादांच्याच नावावर आहे.
2023 मधील बंड: 2023 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बंड केले आणि एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारमध्ये सामील होत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली होती.

राजकीय कारकीर्दीला वादाचीही किनार
अजित पवार यांची राजकीय कारकीर्द अनेक वादांनी गाजली आहे, विशेष म्हणजे 2012 चा सिंचन घोटाळा. जलसंपदा मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात सिंचन प्रकल्पांमध्ये आर्थिक अनियमिततेचे आरोप झाले. अजित यांनी तात्पुरता राजीनामा दिला पण क्लीन चिट दिल्यानंतर ते परत आले, तरीही वादामुळे त्यांची प्रतिमा खराब झाली होती.
2019 मध्ये अजित पवार यांच्या प्रतिष्ठेला आणखी एक फटका बसला जेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला आणि भाजपशी हातमिळवणी केली. हे सरकार 80 तासांतच कोसळले आणि अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात परतले. या घटनेचा परिणाम म्हणजे शरद पवारांवरील अजित पवारांची निष्ठा आणि त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर प्रश्न उपस्थित झाले.
2023 मध्ये शरद पवार यांच्यापासून फारकत घेण्याचा अजित पवारांचा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निष्ठेने काम केल्यानंतरही पक्षावरील शरद पवारांच्या नियंत्रणामुळे अजित पवारांच्या वाढत्या निराशेमुळे फूट पडली. अजित पवार यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाशी हातमिळवणी करून पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या धक्कादायक निर्णयाचे राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटले परंतु अजित पवार यांचा सत्ता आणि शासन यासंबंधीचा व्यावहारिक दृष्टिकोन प्रतिबिंबित झाला.

बारामतीतील अत्याधुनिक बसस्थानक
प्रशासनावरील पकड आणि विकासाचा ‘बारामती पॅटर्न’
अजित पवार हे त्यांच्या धडाडीच्या आणि विकासाभिमुख राजकारणासाठी ओळखले जायचे.
अधिकाऱ्यांवर वचक: अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करण्याचे कडक आदेश देणे आणि ते तडीस नेणे, यात त्यांचा हातखंडा होता. अर्थमंत्री म्हणून राज्याची तिजोरी सांभाळताना त्यांनी नेहमीच आर्थिक शिस्तीला महत्त्व दिले.
बारामतीचा कायापालट: बारामतीला महाराष्ट्रातील एक ‘मॉडेल शहर’ बनवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. उत्तम रस्ते, शिक्षण संस्था आणि वैद्यकीय सुविधा उभारण्यात त्यांनी वैयक्तिकरित्या लक्ष घातले.
सिंचन व ऊर्जा: राज्याचे रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावणे आणि महाराष्ट्राला भारनियमनमुक्त करण्यासाठी त्यांनी जलसंपदा व ऊर्जा मंत्री म्हणून मोठे प्रयत्न केले होते.

पवार कुटुंबाचा बारामतीमधील दिवाळीतील एक फोटो.
कुटुंब आणि खासगी आयुष्य
राजकारणाच्या या धकाधकीच्या प्रवासात त्यांच्या कुटुंबाची त्यांना खंबीर साथ मिळाली. अजित पवार यांचा विवाह सुनेत्रा पवार यांच्याशी झाला. त्यांना पार्थ आणि जय अशी दोन मुले आहेत. कडक राजकारणी असले तरी, कुटुंबाला वेळ देण्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले.
२८ जानेवारीची दुर्दैवी सकाळ

२८ जानेवारी २०२६ ची सकाळ महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक काळा दिवस घेऊन आली. त्या दिवशी अजित पवार हे मुंबईहून बारामतीला त्यांच्या खाजगी विमानाने निघाले होते. मात्र, बारामतीजवळ पोहोचताच विमान लँडिंगच्या प्रक्रियेदरम्यान मोठा तांत्रिक बिघाड झाला आणि त्यांचे विमान भीषणपणे क्रॅश झाले.
या अत्यंत दुर्दैवी अपघातात अजित पवारांसह विमानातील इतर पाच जणांचाही जागीच मृत्यू झाला. वयाच्या ६६ व्या वर्षी अजितदादांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली.

विमान धावपट्टीपासून सुमारे 200 मीटर दूर कोसळले होते.
त्यांच्या पश्चात राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवारांकडे
अजित पवारांच्या अचानक निधनानंतर पक्षासमोर आणि सरकारसमोर मोठे संकट उभे राहिले होते. त्यांचे अपूर्ण काम आणि पक्षाची धुरा कोण नेणार? हा प्रश्न असतानाच, अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री: पक्षाच्या आमदारांनी सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी एकमताने निवड केली. त्यानंतर, ३१ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यासह त्या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली महिला उपमुख्यमंत्री ठरल्या.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा: २६ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांची ‘राष्ट्रीय अध्यक्षा’ म्हणून एकमताने निवड करण्यात आली. याचदरम्यान, अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्यात आले, जेणेकरून संसदेत पक्षाची ताकद कायम राहावी. आज सुनेत्रा पवार आणि त्यांची मुले अजित पवारांचा विकासाचा वारसा पुढे नेत आहेत.
