अमरावतीमधील हे प्रकरण कुठेतरी भ्रष्टाचाराशी निगडित आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या घटनेचे सरकार काय प्रायश्चित्त घेणार? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ही बाब अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री कोण आहेत, हे आज जनतेला माहितीच नाही. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे सर्वेसर्वा असल्यामुळे त्यांनी या प्रकरणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आता तरी पूर्णवेळ गृहमंत्री दिला पाहिजे. या जळीतकांडातील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. मुख्य आरोपींना सोडून भलत्याच निष्पापांना यात अडकवले जाण्याची शक्यता आहे.

महिला-बालकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्यात एकामागून एक गंभीर घटना घडत आहेत. राहुल गांधी यांनी चार दिवसांपूर्वी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता; मात्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावरून हात झटकले. आज पुन्हा एकदा महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
माहिती तातडीने समोर यावी
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, रुग्णालयात हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. राम मंदिरातील चंदा चोरी प्रकरणासारखी ‘एसआयटी’ नेमून अहवालच गायब होईल, असे इथे होऊ नये. सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का? कुठे घोटाळा झाला आहे का? आणि रुग्णालयाचे ‘फायर ऑडिट’ झाले होते का? या सर्वांची माहिती तातडीने समोर आली पाहिजे. सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसल्याचेच यावरून स्पष्ट होते, असेही सपकाळ म्हणाले.
बालकांच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक आहे. ज्या चिमुकल्यांना वाचवण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांचा सुरक्षेच्या अभावामुळे जीव जाणे हा आरोग्य व्यवस्थेचा गंभीर निष्काळजीपणा आहे. या निष्पाप बालकांच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे.
निष्पक्ष चौकशी करत दोषींवर कडक कारवाई करा
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, या घटनेची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच, पुन्हा कोणत्याही निष्पाप बालकाचा जीव जाऊ नये, यासाठी महाराष्ट्रातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडिट आणि वैद्यकीय उपकरणांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश सरकारने द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. मृत चिमुकल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. तसेच, जखमी बालके लवकरात लवकर बरी होऊन आपल्या आईच्या कुशीत परतावीत, हीच प्रार्थना, अशा शब्दांत सपकाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हे ही वृत्त वाचा अमरावतीमध्ये रुग्णालयाच्या बाल युनिटमध्ये आग:3 नवजात बालकांचा मृत्यू, 39 बालके दाखल होती; व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत

अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU) सोमवारी पहाटे सुमारे 3:30 वाजता आग लागली. या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. सहा मुलांना पुढील उपचारांसाठी सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. वाचा सविस्तर