मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक, लेखिका आणि शिक्षिका प्रा. यास्मिन शेख यांचे सोमवारी (24 ऑगस्ट) पुण्यात निधन झाले. त्या 101 वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधना
.
जन्माने ज्यू, मात्र मराठी भाषेशी आयुष्यभराचे नाते
यास्मिन शेख यांचा जन्म 21 जून 1925 रोजी झाला. त्यांचे जन्मनाव जेरुषा रुबेन होते. त्या जन्माने ज्यू कुटुंबातील होत्या. वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे बालपणात त्यांना विविध ठिकाणी राहण्याची संधी मिळाली. या काळातच त्यांच्या मनात शिक्षण आणि भाषेची आवड निर्माण झाली. पुण्यातील एस. पी. महाविद्यालयातून त्यांनी बी.ए.चे शिक्षण घेतले. मराठी विषयात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. प्रा. एस. एम. माटे आणि प्रा. के. एन. वातवे यांसारख्या शिक्षकांचा त्यांच्या भाषिक आणि साहित्यिक जडणघडणीवर मोठा प्रभाव पडला. पुढे त्यांनी एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले.
1949 मध्ये त्यांनी अझीझ अहमद इब्राहिम शेख यांच्याशी आंतरधर्मीय विवाह केला. विवाहानंतर त्यांचे नाव यास्मिन शेख झाले. मात्र, विवाहानंतरही त्यांनी आपली धार्मिक ओळख बदलली नाही. पुढील आयुष्य त्यांनी मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाशी जोडून घेतले.
महाविद्यालयीन अध्यापनापासून भाषाशास्त्राच्या अभ्यासापर्यंत
प्रा. यास्मिन शेख यांनी तत्कालीन औरंगाबादमधील मिलिंद महाविद्यालयात अध्यापन केले. त्यानंतर मुंबईतील शीव येथील एसआयईएस महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. त्या महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुखही होत्या. या काळात साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांबरोबर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. श्री. पु. भागवत आणि विंदा करंदीकर यांसारख्या साहित्यिकांशी त्यांचा जवळचा व्यावसायिक संबंध होता.
निवृत्तीनंतरही त्यांचा भाषेचा अभ्यास आणि अध्यापन थांबले नाही. त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसह आयएएस आणि यूपीएससी परीक्षार्थींना मराठी व्याकरण आणि भाषाशास्त्राचे मार्गदर्शन केले. अनेक पिढ्यांतील विद्यार्थ्यांना त्यांनी मराठी भाषेची शिस्त, रचना आणि सौंदर्य समजावून दिले.
व्याकरण सल्लागार’ म्हणून मिळवले मानाचे स्थान
प्रा. यास्मिन शेख यांची ‘अंतर्नाद’ या मासिकाशीही दीर्घकाळ नाळ जोडलेली होती. त्या मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मराठी लेखनातील चुका, शुद्धलेखन, व्याकरण आणि शब्दप्रयोग याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी लेखक आणि वाचक त्यांच्याशी संपर्क साधत असत.
त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रमाण मराठीचा आग्रह धरतानाच बोलीभाषांकडे त्यांनी कधीही संकुचित दृष्टीने पाहिले नाही. प्रमाणभाषा, बोलीभाषा आणि भाषेतील विविधता यांचा अभ्यासपूर्ण विचार त्या मांडत असत. भाषेचा विकास हा तिच्या विविध प्रवाहांमधून होत असतो, ही त्यांची भूमिका होती. वयाच्या शंभराव्या वर्षातही त्या भाषेच्या अभ्यासात सक्रिय होत्या. व्याकरण आणि भाषाशास्त्र यांचा परस्पर संबंध त्या सातत्याने अधोरेखित करत.
मराठी लेखन मार्गदर्शिकासह महत्त्वाचे ग्रंथ
मराठी भाषा आणि शुद्धलेखनाच्या क्षेत्रात प्रा. यास्मिन शेख यांचे लेखन विशेष महत्त्वाचे मानले जाते. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’, ‘मराठी शब्दलेखन कोश’ आणि ‘सुगम मराठी व्याकरण कोश’ यांसारख्या ग्रंथांमधून त्यांनी मराठी लेखन अधिक अचूक आणि सुबोध करण्यासाठी मार्गदर्शन केले. ‘मराठी शुद्धलेखन प्रदीप’ हे त्यांचे आणखी एक महत्त्वाचे पुस्तक मानले जाते. शुद्धलेखनाचे नियम क्लिष्ट न करता सर्वसामान्य वाचक, विद्यार्थी आणि शिक्षकांना समजतील अशा पद्धतीने मांडण्याचे त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले. मराठी भाषेतील बारकावे समजून घेण्यासाठी त्यांच्या लेखनाचा आणि मार्गदर्शनाचा अनेकांनी आधार घेतला. त्यामुळे त्यांची ओळख केवळ प्राध्यापक किंवा लेखिका म्हणून न राहता मराठी भाषेच्या विश्वासार्ह व्याकरणतज्ज्ञ म्हणून निर्माण झाली.
भाषेला धर्म नसतो, भाषेला जात नसते
प्रा. यास्मिन शेख यांच्या भाषेविषयीच्या व्यापक आणि मानवतावादी दृष्टिकोनाची कायम चर्चा होत राहिली. ‘भाषेला धर्म नसतो, भाषेला जात नसते’ हा त्यांचा विचार त्यांच्या संपूर्ण भाषिक प्रवासाचे दर्शन घडवतो. जन्माने वेगळ्या धार्मिक पार्श्वभूमीतून आलेल्या असूनही त्यांनी मराठी भाषेचा आयुष्यभर केलेला अभ्यास आणि तिच्या संवर्धनासाठी दिलेले योगदान हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण ठरले.
मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला; सुनेत्रा पवारांकडून श्रद्धांजली
प्रा. यास्मिन शेख यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही शोक व्यक्त केला. ‘मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला!’ अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रातील समर्पित व्यक्तिमत्त्व हरपल्याचे त्यांनी म्हटले. मराठी लेखन आणि शब्दलेखन अधिक शुद्ध, सुबोध आणि समृद्ध व्हावे यासाठी त्यांनी आयुष्यभर मोलाचे योगदान दिल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.
‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी शब्दलेखन कोश’ यांसारखे त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील, असेही त्यांनी म्हटले. वयाच्या शंभराव्या वर्षीही मराठीच्या अभ्यासात सक्रिय असलेल्या यास्मिन शेख यांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. प्रा. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी व्याकरण, भाषाशुद्धी, अध्यापन आणि साहित्यविश्वातील एक समर्पित व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. मात्र, त्यांनी लिहिलेले ग्रंथ, विद्यार्थ्यांना दिलेले ज्ञान आणि मराठी भाषेविषयीची त्यांची व्यापक भूमिका पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
हेही वाचा…
नागपूरच्या गोधनी जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिन गॅस गळती: 40 जण रुग्णालयात दाखल, 4 ते 5 जणांची प्रकृती गंभीर; 12 जणांना डिस्चार्ज

नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास क्लोरिन गॅसची गळती झाल्याने खळबळ उडाली आहे. या गॅसच्या संपर्कात आल्याने 40 हून अधिक नागरिकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला असून, 15 पेक्षा अधिक जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्लांटच्या 200 मीटर परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी