नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. “नीट पेपरफुटीचा विषय आता संपला असून जंतर-मंतरवर सुरू असलेले आंदोलन विद्यार्थ्यांसाठी नसून केवळ राजकारणासाठी आहे,” असा आरोप
.
पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “नीटची परीक्षा पेपरफुटीनंतर पुन्हा घेण्यात आली. त्यामध्ये कोणतीही गडबड झाली नाही. निकाल लागले आहेत आणि आता प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे हा विषय धरून सतत राजकारण करणं चुकीचं आहे. विरोधकांनी हे थांबवलं पाहिजे.”
ते पुढे म्हणाले, “उठसूट राजकारण केल्यामुळे देशाचं, समाजाचं आणि वातावरणाचं नुकसान होतं. जगात भारताची प्रतिमाही त्यामुळे खराब होते. विषय एक असतो, पण त्यामागचा हेतू वेगळाच असतो. आज अनेक व्हिडीओ आणि क्लिप्स समोर येत आहेत. या आंदोलनामागचा खरा हेतू काय आहे, हे आता स्पष्ट होत आहे.”
‘संसदेत उत्तर मिळाल्यावर सगळ्यांची पोलखोल होईल’
चंद्रकांत पाटील यांनी दावा केला की, संसदेत सरकारकडून या विषयावर सविस्तर उत्तर दिल्यानंतर विरोधकांचा हेतू उघड होईल. “लोकसभेत जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर उत्तर देतील, तेव्हा सगळ्यांची पोलखोल होईल. त्यामुळे थोडी वाट पाहा. तुमचा हेतू देशातील परीक्षा व्यवस्था सुधारण्याचा आहे की राजकारण करण्याचा, हे स्पष्ट होईल,” असे ते म्हणाले.
‘पेपरफुटी होऊ नये, पण प्रत्येक घटनेसाठी सरकारला दोषी ठरवू नका’
पेपरफुटी ही गंभीर बाब असल्याचे मान्य करतानाच त्यांनी सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले. “पेपरफुटी होऊच नये, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पेपरफुटीनंतर तातडीने परीक्षा घेण्यात आली, निकाल जाहीर झाले आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेलाही गती देण्यात आली,” असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “एखाद्याने आंबा चोरला म्हणून त्याला फाशीची शिक्षा होत नाही. प्रत्येक गुन्ह्याला कायद्यानुसार वेगळी शिक्षा असते. त्याचप्रमाणे पेपरफुटी करणाऱ्यांवरही कारवाई सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी सरकारलाच दोषी ठरवणे योग्य नाही.”
पेपरफुटी करणारे अटकेत, तरीही आंदोलन सुरूच
चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे. “देशात प्रथमच परीक्षा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी लष्कराची मदत घ्यावी लागली. त्यावरही विरोधकांनी टीका केली. नंतर तपासात काही कोचिंग क्लासेस आणि इतर घटकांचा सहभाग समोर आला. संबंधित आरोपी अटकेत आहेत आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. तरीही एकाच मुद्द्यावर आंदोलन सुरू ठेवले जात आहे, यावरून त्यामागचा हेतू वेगळाच असल्याचं दिसून येतं,” असा आरोप त्यांनी केला.
अधिवेशनात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न
जंतर-मंतरवरील आंदोलनाचा उद्देश संसदेचे कामकाज विस्कळीत करणे असल्याचाही आरोप त्यांनी केला. “या आंदोलनामागचा पहिला हेतू म्हणजे संसदेचं अधिवेशन विस्कळीत करणं आणि महत्त्वाची विधेयके मंजूर होऊ न देणं. यापेक्षाही मोठे हेतू आहेत, पण ते मी सध्या सार्वजनिकपणे सांगू शकत नाही,” असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होत असून, या मुद्द्यावर संसदेतही जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
संबंधित बातमी वाचा…
राहुल गांधींची नौटंकी सुरू आहे:काँग्रेसच्या काळात 28 वेळा पेपरफुटी झाली”; चंद्रशेखर बावनकुळेंची सडकून टीका

“नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या नावावर राजकारण केले जात आहे. राहुल गांधींची ही केवळ नौटंकी सुरू असून काँग्रेसच्या काळात तब्बल 28 वेळा पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. त्यांनी अगोदर स्वतःचा इतिहास तपासावा,” अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात आयोजित एका विशेष महायज्ञानंतर बावनकुळे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी दिल्लीत सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन, उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा आणि शरद पवार-पंतप्रधान मोदींच्या भेटीवर सडेतोड भाष्य केले. येथे वाचा संपूर्ण बातमी
सत्र सुरू असताना संसदेबाहेर आंदोलन लोकप्रतिनिधीला शोभत नाही:राहुल गांधींच्या आंदोलनावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची टीका

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप प्रदेश मुख्यालयात आयोजित भव्य रक्तदान शिबिराच्या वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वर्गीय अजित दादा पवार यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. तसेच, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शरद पवारांची पंतप्रधानांसोबतची भेट आणि दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावरून राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्यावर सडेतोड भाष्य केले. येथे वाचा संपूर्ण बातमी
दिल्लीत उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांवर घणाघात: म्हणाले- रावण आणि तुमच्यात फरक काय? फडणवीसांच्या टीकेलाही दिले प्रत्युत्तर

नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. काल त्यांनी जंतरमंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. यानंतर आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत ठाकरेंनी केंद्र सरकारवर आणि भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. ‘सत्तेची हवा डोक्यात गेल्याने सरकार विद्यार्थ्यांशी संवाद साधत नाही,’ असा आरोप करत त्यांनी ‘तुमच्यात आणि रावणात फरक काय?’ असा सवाल सरकारला विचारला आहे. सविस्तर वाचा