नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीची डोकेदुखी वाढवली असून आता या निवडणुकीत नवा राजकीय ट्विस्ट आला आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या ऑफर येत असल्याचा दावा गीत
.
उमेदवारी मागे घेण्यास नकार, महायुतीची वाढली चिंता
नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र भाजपशी संबंधित मानले जाणारे गोकुळ गीते यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे महायुतीच्या मतांची विभागणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“उमेदवारी मागे घ्या” म्हणून अनेक प्रस्ताव
गोकुळ गीते यांनी माध्यमांशी बोलताना उमेदवारी मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला. तसेच विविध प्रकारच्या ऑफरही दिल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र आपण कोणत्याही दबावाला बळी पडणार नसून कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आज शिंदेंसोबत महत्त्वाची चर्चा
गीते आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. या भेटीत नेमकी कोणती चर्चा होणार, गीते माघार घेणार का, की निवडणुकीत कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असल्याने शिंदे स्वतः या प्रकरणात लक्ष घालत असल्याची चर्चा आहे.
वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न निष्फळ
गेल्या काही दिवसांत भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन तसेच शिवसेना नेते उदय सामंत यांनी गोकुळ गीते यांची भेट घेऊन माघारीसाठी प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. मात्र, गीते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.
कोण आहेत गोकुळ गीते?
नाशिक जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात गोकुळ गीते हे परिचित नाव मानले जाते. स्थानिक पातळीवर त्यांचे स्वतंत्र राजकीय नेटवर्क असून काही भागात त्यांना चांगला पाठिंबा असल्याचे मानले जाते. याच कारणामुळे त्यांच्या उमेदवारीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या निवडणूक रिंगणात राहण्यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विजयाचे गणित बिघडू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नाशिक विधान परिषद निवडणुकीत नेमके समीकरण काय?
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ही निवडणूक सध्या महायुती विरुद्ध बंडखोरी अशी बनली आहे. अधिकृत उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे मैदानात असले तरी गोकुळ गीते यांच्या भूमिकेमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. आगामी काही दिवसांत गीते माघार घेतात की लढतीत कायम राहतात, यावर या निवडणुकीचे अंतिम समीकरण मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.
संबंधित बातमी
नाशिकमध्ये भाजपचे ‘ऑपरेशन मनधरणी’:उदय सामंत म्हणाले- गोकुळ गीतेंवर कोणताही दबाव टाकला नाही, विनंती करणे 302चा गुन्हा होत नाही!

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुतीसमोरील राजकीय अडचणी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. राज्यसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्याने निर्माण झालेली चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच आता नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर नेते गोकुळ गीते यांनी पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढवली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक फेऱ्यांच्या चर्चांद्वारे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गीते यांनी अद्याप माघार घेण्याचे स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या आधीच महायुतीच्या राजकीय गणितात नवा ट्विस्ट आला आहे. सविस्तर बातमी