![]()
प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. राजकारणात बाँड किंवा ॲग्रीमेंट काहीही नसते. त्यामुळे भाजप व शिवसेना 2029 ला स्वतंत्रपणे लढू शकते का? तर लढू शकते, असे विधान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यांच्या या व
.
संजय शिरसाट यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचे सांगत उपरोक्त विधान केले. ते म्हणाले, प्रत्येक पक्षाला स्वतःचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार, तो आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो. 2029 ला भाजप स्वबळावर लढणार काय, तर लढू शकते. शिवसेना वेगळी लढेल काय, तर लढू शकते. कारण राजकारणात असा कोणताही बाँड किंवा ॲग्रीमेंट नसते की, येणारी निवडणूक आपण अशी लढणार आहोत किंवा तशी लढणार आहोत. आपण एका जागेसाठी शिवसेना – भाजपची युती तुटताना पाहिली आहे.
त्यामुळे त्यांनी तयारी करणे किंवा इतर पक्षांनी तयारी करणे यात काहीही गैर नाही. भाजप – शिवसेनेने तयारी केली म्हणून त्यांनी तुम्हाला थांबवलंय का? आम्ही आमची तयारी करतो, तशी सर्व पक्ष आपापली तयारी करत असतात. यात काहीच गैर नाही.
ठाकरे गटावरही साधला निशाणा
संजय शिरसाट यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरही निशाणा साधला. ठाकरे गटाला काँग्रेस व शरद पवार गट त्यांच्या नेत्याला पुन्हा मुख्यमंत्री करतील असे वाटत असेल, तर ते केवळ स्वप्नात वावरत आहेत. त्यांनी स्वप्न पाहण्यापेक्षा वास्तविकतेला सामोरे गेले पाहिजे. येणारे कोणतेही संकट किंवा आव्हाने स्वीकारण्याची ताकद केवळ आमच्या शिवसेनेत आहे. दुसऱ्यावर टीका करून आपला पक्ष मोठा होत नाही. आम्ही कोण काय करत आहे यापेक्षा आमचा पक्ष कसा पुढे नेता येईल याची चिंता करत असतो. स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी कुणीही कुणालाही थांबवले नाही, असे ते म्हणाले.
शिवसेनेत प्रवेश केलेल्या बच्चू कडूंनाही सोडले नाही
संजय शिरसाट यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेल्या बच्चू कडू यांनाही टोला हाणला. बच्चू कडू यांना आगामी राजकारणाची दिशा माहिती आहे. त्यांनी अगोदर काँग्रेससोबत केलेला घरोबा ही काय आत्महत्या नव्हती काय? त्यांनी काँग्रेससोबत केवळ संगत केली नव्हती, तर शय्या केली होती, असे ते म्हणाले.