![]()
अजिंठा वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनाड येथे ‘मूल्यवर्धन व आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती बनवण्याची नावीन्यपूर्ण कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने आकर्षक व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारून उपस्थितांची मने जिंकली. अजिंठा येथील चित्रकार व मूर्तिकार अनुष्का ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह सोपे धडे दिले. विद्यार्थ्यांनी शाडूची माती आणि नैसर्गिक रंगांचा सुरेख वापर करत विविध रूपांतील बाप्पाच्या मूर्ती घडवल्या. स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती साकारताना लहानग्यांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासोबतच पर्यावरण रक्षण व जलप्रदूषण टाळण्याचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवले गेले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शेख बशीर यांच्यासह शिक्षक संतोष दौंड, अनिल गुप्ता, सीमा माहोर व सीमा कोकाटे यांनी विशेष परिश्रम घेतले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या ‘इको फ्रेंडली’ गणपतींचे अनाड येथील ग्रामस्थ, पालक आणि शिक्षणप्रेमींनी भरभरून कौतुक केले. या उपक्रमातून ‘पर्यावरण वाचवा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा’ असा मोलाचा आणि सकारात्मक संदेश समाजात पोहोचला आहे. अनाड शाळेतील विद्यार्थी इको फ्रेंडली गणपती साकारताना.
Source link
अनाड जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारले ‘इको फ्रेंडली गणपती’