![]()
शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फुटले असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. या 6 खासदारांनी जेव्हा बंड पुकारले होते तेव्हा शिवसेना ठाकरे गटाने महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला 6 खासदार गैरहजर होते. त्यानंतर आता खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या बैठकीनंतर सावंत आणि देसाई यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. अरविंद सावंत म्हणाले, आम्ही माननीय बिर्ला साहेबांना एक पत्र दिले होते. त्या पत्रात आम्ही अशी विचारणा केली होती की आमच्याकडून जे 6 गैरहजर राहिलेले खासदार आहेत, त्यांनी कोणाला व्यक्तिगत पत्र दिले असेल किंवा काही प्रस्ताव दिला असेल तर आपण तो त्याची दखल घेऊ नये. कारण ते आमच्या पक्षातील माणसं आहेत. ते आमच्यासोबत आहेत. त्यांनी पक्ष सोडल्याचा काही दावा केला असेल तर ते आम्हाला कळवावे. तसेच चुकून असा काही प्रस्ताव आला किंवा माहिती आली तर आमच्या आपण बोलले पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे, अशी विनंती केली होती. त्यांनंतर त्यांनी बैठकीसाठी बोलावले होते. पुढे बोलताना अरविंद सावंत म्हणाले, बैठकीत आम्ही त्यांना सांगितले की दरम्यानच्या काळात असे दिसून आले होते की 6 लोक आले नव्हते आणि असे करत ही मंडळी दुसऱ्या पक्षात गेली. म्हणून आज आम्ही असे निवेदन दिले की दोन तृतीयांशच्या संदर्भात काही आले असेल तर त्या बाबतीत देखील आमचे काही म्हणणे आहे आणि ते कायदेशीर आणि संविधानात्मक आहे. संविधानात ज्या तरतुदी आहेत त्या पाळल्या जाव्यात अनिल देसाई यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. आमचे जे लोकसभेचे खासदार आहेत, त्यातील काही लोकांनी गट केला असेल आणि आपल्याजवळ आले आणि त्यांनी काही व्यवस्था करण्याची मागणी केली असेल तर त्या प्रकाराला कुठलाही थारा न देता आमचे म्हणणे ऐकावे. संविधानात ज्या तरतुदी आहेत त्या पाळल्या जाव्यात. या लोकांनी जे केले आहे त्याला थारा मिळू नये पुढे बोलताना अनिल देसाई म्हणाले, संविधानांचे पालन व्हावे आणि या लोकांनी जे केले आहे त्याला थारा मिळू नये. दोन तृतीयांश जारी त्यांचा आकडा असला तरी संविधानात जे शेड्यूल 10 मध्ये जे प्रोव्हीजन आहे, त्यात जी मुळ पॉलिटिकल पार्टी आहे, त्या पार्टीचे दुसऱ्या कोणत्या पार्टीसोबत मर्ज होत असेल तर लेजीस्लेचर पार्टीचे जे सभासद आहेत त्यांच्यापैकी दोन तृतीयांशाचा आकडा त्याला सपोर्ट असला पाहिजे. तर तशा प्रकारचे जे शेड्यूल 10 च्या पॅरा 4 मध्ये जी तरतूद आहे ती त्यांना आम्ही आवर्जून दाखवली. त्यांनी याची नोंद घेतली आहे. आम्ही ओरिजनल पार्टी आहोत. अरविंद सावंत हे गट नेते आहेत, मी स्वतः प्रतोद आहे. हे जे खासदार आहेत ते शिवसेनेकडून आणि मशाल चिन्हावरून निवडून आले होते. त्यांना संविधानांचे सर्व नियम लागू असून त्यानुसारच न्यायनिवाडा करावा, अशी मागणी आम्ही ओम बिर्ला यांच्याकडे केल्याची माहिती अनिल देसाई यांनी दिली आहे. आमचे प्रमुख उद्धव ठाकतरे यांनी देखील पत्र दिले होते की आम्ही कोणत्याही पक्षात विलीनीकरण करणार नाही. त्यामुळे यावर योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे.
Source link
अरविंद सावंत आणि अनिल देसाईंनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट:शिवसेना ठाकरे गटाच्या फुटलेल्या 6 खासदारांवर योग्य कारवाई करण्याची मागणी