![]()
मुलांनी शिक्षण घेऊन नोकरी शोधण्यापेक्षा उद्योजक व्हावे. छोट्या मोठ्या व्यवसायातूनच उंच झेप घेता येते. ज्ञान हे यशाचा मूलमंत्र आहे. युवकांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे व त्यात उत्तुंग भरारी गाठण्यासाठी अहोरात्र कष्ट करावेत. विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. मोबाइल रील मधून वेगळे होऊन रियल आयुष्यामध्ये जगण्याच्या संधी शोधाव्यात असे प्रतिपादन उद्योजकव लेखक एन. बी. धुमाळ यांनी केले. सहकारमहर्षी स्व. दादा पाटील राजळे यांच्या जयंतीनिमित्त स्मृती व्याख्यानमालेच्या दुसऱ्या व्याख्यानप्रसंगी धुमाळ यांनी ‘युवकांनो उद्योजक बना’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी प्रा.दशरथ खोसे, डॉ. यशवंत गवळी, रामकिसन काकडे, बाबासाहेब किलबिले, बापूसाहेब पाटेकर, पोपटराव आंधळे उपस्थित होते. धुमाळ म्हणाले, परिस्थिती व घटना बदलत असतात त्याप्रमाणे योग्य निर्णय घेऊन आपली वाटचाल असावी. जे मिळाले ते सर्वोत्तम आहे, असे मानून स्वप्रयत्न, स्वकष्टाने व जिद्दीने आपले ध्येय साध्य करावे. आपले ध्येय हे नेहमी उच्चकोटीचे असावे. योग्य आदर्श आपल्या डोळ्यासमोर असावेत. जग खूप झपाट्याने बदलत आहे तेव्हा आपण काळजीपूर्वक आर्थिक व्यवहाराकडे पाहिले पाहिजे. याप्रसंगी त्यांनी स्वलिखित ‘यशाचे १११ मंत्र’ या पुस्तकाच्या प्रती महाविद्यालयाचे ग्रंथालयास भेट दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ संचालक उद्धव वाघ यांनी स्व. दादा पाटील राजळे यांच्या स्मृतीस उजाळा दिला. यावेळी महाविद्यालयातून निवृत्त झालेले डॉ. सुभाष देशमुख, डॉ. जालिंदर कानडे, प्रा.गोरक्ष अकोलकर, विष्णू साप्ते यांचा सपत्नीक सत्कार महाविद्यालयातर्फे करण्यात आला. राहुल राजळे यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आढावा घेतला व सर्वांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जे. एन. नेहुल यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जीवनात सकारात्मक दृष्टीकोन महत्वाचा जीवन जगत असताना सकारात्मक दृष्टिकोनाचे फार मोठे महत्त्व आहे. याच बरोबर सामाजिक समस्येवर विचार मंथन करताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली. आपल्या ओघवत्या वाणीत धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Source link
आजच्या काळात ज्ञान आणि स्वकष्टानेच यश मिळणे शक्य:आजच्या विद्यार्थ्यांनी उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावेत