![]()
शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेबरोबरच त्यांच्या अभ्यासातील सातत्य, वेळेचे नियोजन आणि मेहनतीची कसोटी पाहणारी परीक्षा आहे. परीक्षेत मिळालेले यश अंतिम ध्येय न मानता भविष्यातील मोठ्या यशाची पहिली पायरी म्हणून विद्यार्थ्यांनी त्याकडे पाहावे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीचे आणि क्षमतेचे क्षेत्र ओळखून त्यानुसार ध्येय निश्चित करावे. अडचणी आल्या तरी खचून न जाता सातत्याने प्रयत्न करण्याची वृत्ती विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजे. यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीशी त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे मोठे योगदान असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा योग्य उपयोग करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी केले. शिशु संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशाला व श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूलमध्ये विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन दिलीप गुंदेचा, व्हाईस चेअरमन दशरथ खोसे, सेक्रेटरी र. धों. कासवा, सहसेक्रेटरी राजेश झालानी, विश्वस्त शिवनारायण वर्मा उपस्थित होते. त्या पुढे म्हणाल्या, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पाठांतर करून चालणार नाही, तर विषय समजून घेणे, प्रश्नांचा चिकित्सक विचार करणे, वेळेचे योग्य नियोजन करणे आणि आत्मविश्वासाने परीक्षा देणे या बाबींना विशेष महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी मोबाइल आणि इतर अनावश्यक गोष्टींपासून योग्य अंतर ठेवून अभ्यासाला प्राधान्य द्यावे. पालकांनीही मुलांवर केवळ गुणांसाठी दबाव न आणता त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करावे. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ओळखून त्याला योग्य दिशा दिली तर अनेक विद्यार्थी भविष्यात विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करू शकतात. यावेळी इयता बारावी, दहावी परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला तसेच या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचाही यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दत्तात्रय कसबे यांनी केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य राखून भविष्यातही उत्कृष्ट कामगिरी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलकर्णी यांनी केले, तर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका योगिता गांधी यांनी आभार मानले. गुणवंत विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप यावेळी इयता बारावी, दहावी परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला तसेच या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचाही यावेळी गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक करण्यात आले.
Source link
मोबाइल टाळा आणि क्षमतेनुसार ध्येय निश्चित करा:माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांचे विद्यार्थ्यांना आवाहन