![]()
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पेरणी करूनही उगवण न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या तक्रारीनंतर अखेर कृषी विभागाने बुस्टर कंपनीच्या ‘हुतूतू’ सोयाबीन बियाण्यांचे नमुने अधिकृत तपासणीसाठी प्रयोगशाळेत रवाना केले आहेत. शेतकऱ्यांनी संबंधित बियाण्यांच्या उगवणीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्यानंतर ८ जुलै रोजी निर्भय कृषी मंदिर कृषी सेवा केंद्र मोर्शी येथील सोयाबीन बियाण्यांचे नमुने गुणनियंत्रण अधिकारी दिनेश चौधरी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोर्शी पंचायत समिती येथील गुण नियंत्रण अधिकारी राहुल चौधरी यांनी सर्वाधिक तक्रारी असलेल्या लॉट क्रमांकाचे नमुने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोर्शी तालुका अध्यक्ष रुपेश वाळके, गोपाल मंत्री, हितेश साबळे, उमेश राऊत, विवेक शहाणे यांच्या उपस्थितीत सोयाबीन नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. मोर्शी तालुक्यातील अनेक गावांमध्ये हजारो एकर क्षेत्रात या बियाण्याची पेरणी करण्यात आली होती. प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालामध्ये बियाणे निकृष्ट दर्जाचे आढळल्यास बुस्टर कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला संपूर्ण आर्थिक भरपाई देण्यात यावी. ८ दिवसाच्या आत बोगस सोयाबीन बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा मोबदला न मिळण्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी दिला आहे. शेतकऱ्यांचा संताप; जबाबदार कोण? बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सोयाबीन बियाण्यांची गुणवत्ता योग्य प्रकारे तपासली गेली असती तर आज शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली नसती.त्यामुळे केवळ बियाणे कंपनीच नव्हे तर गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यासाठी जबाबदार कोण, असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत. शेतकरी आधीच कर्जबाजारी झाला असताना त्याची जर अशाप्रकारे उगवण क्षमता नसलेल्या बियाण्यांमुळे फसगत होत असेल तर संबंधित विभागाने कठोर भुमिका घ्यायला हवी, अशा शब्दांत प्रतिक्रिया उमटणे साहजिकच आहे.
Source link
आर्थिक फटका:‘बुस्टर’ कंपनीचे ‘हुतूतू’ सोयाबीन बियाणे तपासणीसाठी प्रयोगशाळेत, कृषी विभागाने घेतली आंदोलनाची दखल