![]()
श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस पूर्ण झाल्यानंतर आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडताच लाखो वारकऱ्यांनी रविवारी परतीचा प्रवास सुरू केला आहे. यामुळे पंढरपूरचे बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच प्रमुख रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. दरम्यान, मंदिर परिसर, दर्शनरांग वगळता शहरात सर्वत्र वातावरण अगदी सामान्य झाल्याचे दिसून येते. शनिवारी एकादशी सोहळा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा झाली. यानंतर एकादशीच्या दुपारपासूनच मोठ्या संख्येने भाविक आपापल्या गावी जाण्यासाठी रवाना झाले होते. त्यामुळे रविवारी दुपारी तीन वाजेनंतर पंढरपूर शहरातील मुख्य रस्त्यांवरील ताण कमी होऊन रस्ते मोकळे झाले. मात्र, एसटी बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात परतीच्या प्रवासासाठी वारकऱ्यांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. विशेषता रेल्वेने परतणाऱ्या भाविकांची संख्या अधिक दिसून येत होती. पदस्पर्श दर्शनाची रांग १५ व्या शेडपर्यंत पोहोचली अनेक वारकरी परतीच्या प्रवासाला लागले असले तरी मंदिर परिसर, ६५ एकर क्षेत्र, प्रदक्षिणा मार्ग आणि श्री विठ्ठल दर्शनरांगेत अजूनही भाविकांची मोठी उपस्थिती आहे. पदस्पर्श दर्शनाची रांग १५ व्या शेडपर्यंत पोहोचली असून भाविक शिस्तीत दर्शन घेत होते. एसटी महामंडळ आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून वारकऱ्यांच्या सुलभ प्रवासासाठी विशेष बस व गाड्यांची सोय करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी केले चोख नियोजन एकादशीनंतर परतीच्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, पोलिस प्रशासनाने केलेल्या चोख आणि नेटक्या नियोजनामुळे वाहतूक कोंडी टाळता आली आणि वाहतूक लवकर मार्गी लागली.रविवारी दुपारनंतर शहरातील रस्त्यावरील वाहतूक सामान्य झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Source link
आषाढी सोहळ्यानंतर पंढरपुरातून लाखो वारकरी परतीच्या मार्गावर:दुपारपर्यंत वाहतूक सुरळीत झाल्याचे चित्र