Headlines

इर्ले येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार:कै.पाटील यांच्या स्मरणार्थ, 10 वी, 12 वी मधील यशवंतांचा गौरव‎




शिक्षणाचा वारसा जपत गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने इर्ले येथे पाटील परिवाराच्या वतीने कै. उद्धवरावजी पाटील व कै. अंबादास (नाना) पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला गुणवंतांचा सत्कार व स्नेहमेळावा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमात गावातील गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रांत यश संपादन करणारे युवक-युवती, शिक्षक तसेच मान्यवरांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शालिनी सतीश पाटील होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माढा तालुका पंचायत समितीचे सभापती पंडितराव तुकाराम देशमुख तसेच कर्मवीर पुरस्काराने सन्मानित प्रा. रविराज पाटील उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पंडितराव देशमुख यांनी इर्ले गावाचा गौरवशाली इतिहास, कै. उद्धवराव पाटील यांचे सामाजिक व शेतकरीहिताचे कार्य तसेच पाटील परिवाराचे गावाच्या विकासातील योगदान अधोरेखित केले. इर्ले व परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदावर रुजू झालेल्या पुनम शिंदे तसेच भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झालेले भास्कर जगदाळे यांनी पुढील वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष रोख बक्षिसे देण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. या कार्यक्रमात भारतीय सैन्य, शासकीय सेवा तसेच विविध क्षेत्रांत स्वतःच्या कर्तृत्वावर नोकरी मिळविणाऱ्या युवक-युवतींचाही विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेअरमन किरण पाटील, मुकुंदा पाटील, अभिजित पाटील, प्रकाश देवकते, सचिन देवकते यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. पारितोषिके आणि बक्षिसांची लयलूट या कार्यक्रमात प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसह दहावी व बारावी परीक्षेत उत्कृष्ट गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व पेन देऊन सत्कार करण्यात आला. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अमोल कांबळे यांनी गावातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दहावी व बारावी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १००१ रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान केले. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *