Headlines

उन्हाचा सामना करत १३.५६ तासांत २६७ किमीचे अंतर पार:चारसायकलप्रेमींची अहिल्यानगर ते रायगड खडतर सायकल वारी यशस्वी




प्रतिनिधी | अहिल्यानगर शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगरमधील सायकलप्रेमी मावळ्यांनी ‘अहिल्यानगर ते किल्ले रायगड’ अशी विशेष सायकल वारी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. भर उन्हाळ्यातील उन्हाचा कहर, विरुद्ध दिशेने वाहणारे प्रचंड वारे आणि तब्बल २,८०० मीटर चढाईचा (एलिव्हेशन) खडतर मार्ग अशा सर्व आव्हानांवर मात करत या सायकलप्रेमींनी १३ तास ५६ मिनिटांच्या प्रत्यक्ष सायकलिंग वेळेत हे अंतर कापून गडपती शिवरायांच्या चरणी आपली वारी अर्पण केली. या सायकल वारीत अहिल्यानगरचे सायकलप्रेमी शरद डोंगरे, डॉ. धनंजय राजगुडे, सत्यनारायण पुरोहित आणि बापू कांडेकर या चौघांचा समावेश होता. २३ मे रोजी पहाटे ५ वाजता अहिल्यानगरमधून या सायकल वारीचे प्रस्थान झाले. मनात रायगड गाठण्याची जिद्द आणि वेळेचे अचूक नियोजन करून सायकलप्रेमींनी प्रवासाला सुरुवात केली. कुठेही जास्त वेळ न घालवता पहिल्याच दिवशी २१० किलोमीटरचे मोठे अंतर पार करत, हे सायकलप्रेमी अंधार पडायच्या आत मुळशी परिसरातील ताम्हिणी घाटात पोहोचले. ताम्हिणी घाटातील निसर्गरम्य वातावरणात पहिल्या दिवसाचा मुक्काम करण्यात आला. दुसऱ्या दिवशी (२४ मे) सकाळी ताम्हिणी घाटातून पुन्हा प्रवासाला सुरुवात झाली. अत्यंत अवघड मानला जाणारा हा टप्पा पार करत, निजामपूरमार्गे सायकलप्रेमी रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे सुखरूप पोहोचले. अहिल्यानगर, शिरूर, वाघोली, डेक्कन, कोथरूड, मुळशी, ताम्हिणी घाट, निजामपूर ते पाचाड आणि अंतिम टप्पा किल्ले रायगड असा एकूण २६७ किलोमीटरचा प्रवास या मावळ्यांनी सायकलवर पूर्ण केला. ही केवळ राईड नव्हती, तर शिवचरणी भक्ती होती ^ भर उन्हाळ्यात २६७ किमीची सायकल वारी करणे हे आमच्यासाठी शारीरिक आव्हान नव्हते, तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केलेली एक भक्ती होती. प्रवासादरम्यान मे महिन्याचे कडक ऊन आणि समोरून येणारे वारे आमची परीक्षा घेत होते. त्यातच २,८०० मीटरचे एलिव्हेशन (चढण) पार करताना पाय थकत होते, पण मनातील रायगड गाठण्याची आणि शिवरायांना अभिवादन करण्याची जिद्द आम्हाला पुढे जाण्याची ऊर्जा देत होती. – शरद डोंगरे, सायकलप्रेमी, अहिल्यानगर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *