![]()
नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भोंदू अशोक खरात भेटीबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले असून, हा सर्व प्रकार केवळ अज्ञानातून आणि दीपक केसरकर यांच्या आग्रहामुळे घडल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा शिर्डीला आले होते, तेव्हा त्यांना खरातच्या पार्श्वभूमीबद्दल कोणतीही कल्पना नव्हती, असे विखे पाटलांनी सांगितले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे एके दिवशी आले. ते मला म्हणाले की एके ठिकाणी जायचे आहे. अशोक खरातबाबत माहिती असती तर ते तिकडे गेले असते का? असा सवाल विखे पाटलांनी उपस्थित केला. नाशिकमध्ये ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. अनेक महिला अशोक खरातच्या वलयाला बळी पडल्या राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, अशोक खरात प्रकरणात आम्ही पहिला गुन्हा दाखल केला म्हणून हे प्रकरण उघडकीस आले. अनेक महिला अशोक खरातच्या वलयाला बळी पडल्या. अंजली दमानिया यांनी जे आरोप केले आहेत, त्याबाबतचे सत्य चौकशीत समोर येईल. अनेकांचे पाय धुताना फोटो आहेत, भाषण करताना नावे आलेली आहेत. आपल्या भागातील माणूस देवाचा अवतार आहे, असे समजून शिर्डीतील काही लोक बळी पडले. पण यासाठी लोकांना दोष देऊ नये. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे पुढे बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, समता पतसंस्था प्रकरणात जबाब नोंदवले गेले आहेत. अशोक खरात स्वतः अकाउंट उघडायचा आणि ऑपरेट करायचा. अनेक महिलांना फसवण्यात आले. अज्ञानाने घडलेल्या गोष्टी आणि माहिती असून जाणे, यामध्ये फरक आहे. इथून पुढे कोणी भविष्य सांगायला आले, तर आधी त्याचे भविष्य बघावे लागेल. अंजली दमानिया यांच्याकडे भरपूर माहिती असेल. रोज नवीन प्रकार समोर येत आहेत. जे दोषी असतील, ते मोठ्या पदावर असतील तरी कारवाई झाली पाहिजे, असेही विखे पाटील म्हणाले. दरम्यान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत अशोक खरातच्या संदर्भातील राजकीय नेत्यांची नावे जाहीर केली. त्यात राधाकृष्ण विखे पाटील यांचे देखील नाव होते. तसेच दमानिया यांनी आजच्या पत्रकार परिषदेत रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Source link
'एकनाथ शिंदे आले आणि म्हणाले एके ठिकाणी जायचेय..':मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितला खरातच्या भेटी मागचा किस्सा