![]()
ओबीसी आरक्षणाचे रक्षण, जातीनिहाय जनगणना आणि समाजाची एकजुट या मागण्यांसाठी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी एल्गार पुकारला आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे झालेल्या जनजगृती सभेत त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली असून लवकरच ‘चलो मुंबई’चा नारा देणार असल्याचे जाहीर केले आहे. जयपूर येथील जनजागृती सभेनंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. यावेळी प्रा. हाके म्हणाले की, महाराष्ट्रातील गावगाड्यातील ओबीसींचे 70 टक्के आरक्षण आता संपले आहे. नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये ओबीसींना आता प्रतिनिधित्व मिळेनासे झाले आहे. “मुख्यमंत्री म्हणतात ओबीसी आमचा डीएनए आहे, मग आरक्षण संपत असताना ते शांत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने मराठा समाजाची उपसमिती व ओबीसींची मंत्रिमंडळ उपसमिती यांना समोरासमोर बसवावे, आम्ही आरक्षण कसे संपले हे सिद्ध करून दाखवू, असे आव्हानही त्यांनी दिले.
ओबीसींच्या जनजागृतीसाठी पहिल्या टप्प्यात 100 सभांचे नियोजन करण्यात आले असून, जयपूर येथील ही 20 वी सभा होती. या सभा पूर्ण झाल्यानंतर सर्व ओबीसी बांधवांना घेऊन मुंबईवर धडक देणार असल्याचे प्रा. हाके यांनी स्पष्ट केले. “जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी सत्ता मे भागीदारी” या तत्त्वावर ओबीसींना एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. मराठा आंदोलकांच्या आत्महत्यांनंतर सरकार त्यांना 10 लाखांची मदत करते, मात्र गेल्या काही काळात 25 पेक्षा जास्त ओबीसी, बंजारा आणि धनगर समाजाच्या बांधवांनी आत्महत्या केल्या, तरी सरकारने त्यांचाकडे दुर्लक्ष केले असून सरकार कडून ओबीसींना सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पंढरपूर येथे आमदार रोहित पवार यांच्या उपोषणावरही त्यांनी कडाडून टिका केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आजच्या दुरवस्थेला गेल्या 40-50 वर्षांचे पवार कुटुंबीयांचे राजकारण जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला. आमदार रोहित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी; एका बाजूला ईडी-सीबीआयच्या भीतीने अर्धे कुटुंब सत्ताधाऱ्यांसोबत आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कैवाराचा आव आणणे, हे आता चालणार नाही, असेही ते म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग आमच्या ओबीसींच्या वाड्या-वस्त्यांवरूनच जातो, हे विसरू नका. जर तुम्ही आम्हाला बेदखल करणार असाल, तर आम्ही तुम्हाला निवडणुकीत पराभूत करू, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी सर्वच राजकीय पक्षांना दिला आहे.
Source link